मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

'स्त्री "मुक्ती " दिन' खरंच?

      'स्त्री "मुक्ती " दिन' खरंच? ३ जानेवारी १८३१ ही तारीख संपूर्ण भारतवर्षात अजरामर ठरली. कारणही तसेच. त्या तारखेला जन्मलेली एक स्ञी संपुर्ण स्ञीयांच्या स्ञीमुक्तीचा महामार्ग निर्माण करणारी क्रांतीज्योती झाली. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले'‌. अंधकार हा शब्द स्ञी च्या आयुष्याला असा चिकटलेला होता की, चुल आणि मुल यापलिकडे‌ या समाजात ती शुन्यात गणली जायची. जातीचाच विचार केला तर त्यावेळच्या जातीव्यवस्थेतील सर्वात उच्च जातीच्या स्ञीचेही हात दगडाखालीच होते. शिक्षण हा शब्द थोडा जरी तिच्या कानी असला तरीही त्याची कवाडं कुठे असतात? कसे उघडतात? याचा दूरपर्यंत थांगपत्ताही तिला लागला नसावा. मग इथेच ही अशी परिस्थिती तर बाकी स्ञियांचे आयुष्य हे अजून हातोटीचे. गावकुसाबाहेर ठेवल्या जाणाऱ्या अस्पृश्यांना साधी भाकरी मिळविण्यासाठीसुध्दा "जोहार माय बाप जोहार" म्हणून भीक मागावे लागत असे. जिथे पुरुषांना शिक्षणासाठी कष्ट उपसावे लागलेत तिथे त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या स्ञियांचे तर शिक्षणाच्या महायज्ञात नामोनिशाण असणं ही अशक्य बाब होती पण याच अशक्यप्राय गोष्टीला शक्यतेचा कळस दाखविला तो त्यांच्यातल्याच एक धाडसी साविञीने. 

आज अजुनही सौम्य प्रमाणात का होईना स्ञियांना आपल्या स्व-अस्तित्वासाठी विविध समस्यांना सामोरे जात लढावे लागते. काळ बदलला माञ स्ञी ची प्रतिमा आजही समाजातील विशिष्ट घटकांच्या नजरेतून विषमच मानली जाते. त्याचा ञास त्यांना होतोच पण त्यावेळेस तो विरोध‌ ऐवढा तीव्र होता की, स्ञी ने माजघराची चौकटही ओलांडू नये. या अशाही बिकट परिस्थितीत ज्योतिरांवाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी स्वत: शिक्षणाचे धडे घेत समाजाच्या नियमांना फाट्यावर मारत मुलींना घराच्या उंबरठ्यातून मुक्त केले व लेखणीच्या बंधनात अडकवले. काय धाडस म्हणावं या धिटाईचं. म्हणूनच आज त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन तसेच महिला मुक्तीदिन म्हणून साजरी केली जाते. 

साविञीबाईंनी हे कार्य सुरु करुन आज शतकवरही उलटून गेले. शिक्षणाचा लढा यशस्वी झाला. त्याचे अफाट स्वरूप आपण सध्याच्या शाळा- महाविद्यालयात मुलींची पटसंख्या बघून प्रत्यक्षदर्शी अनुभवतोय. परंतू अजूनही मला एक प्रश्न पडतो. खरच आजची स्ञी मुक्त आहे का? संविधानाने जर तिला स्वातंञ्य दिलं असलं,  तिने तिच्या याच स्वातंञ्याच्या अभिव्यक्तीच्या जोरावर दाही दिशांत उच्चपदावर आपल्या यशाचा इंद्रधनुष्य पसरवला असला तरीही ती आज स्वतंत्र आहे का? पर्यायाने या समाजाने तिला स्वतंञता दिलीय का? रोज मला हा प्रश्न पडतो? का? 'माहित नाही'. हेच उत्तर इतके दिवस माझी मनस्थिती मला देत होती. आज माञ माझं मन मला  स्पष्ट उत्तर जरी देत नसेल तरी या प्रश्नाकडे बघण्याचा एक विचारशील दृष्टोकोन माञ माझ्यात नक्कीच निर्माण करतो. अनेक घटनांचा माझ्या मनावरचा परिणाम म्हणजे हे प्रश्न एवढं नक्की उमगलं.

 खूप गांभीर्याने विचार केला. हे जग ना, फार पुढे गेलंय पण काही रुढी, परंपरा, अनिष्ट चालीरीतींशी इतकं जखडून बसलंय ना की, आता त्याचाही श्वास कोंडतोय माञ मुक्तीची वाट दिसतच नाही. यात मुख्यत्वेकरून स्ञियांचीच जखडण होतांना दिसते. कारण आजची स्ञी म्हणजे चुल आणि मुल च्या पलिकडे गेली असली तरी चुल आणि मुल सांभाळून बाहेरचं जग आणि त्यात सांसारिक जवाबदाऱ्या हे सगळं करणार फक्त स्ञी आणि तेही एकहाती. हे विदारक असलं तरी अजूनही वास्तव आहे याचं माञ वाईट वाटतं. स्ञीसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा असला तरी अहवाल काढून बघा. ग्रामीण भागात किती प्रमाणात स्ञिया १० वी नंतर पुढे शिक्षण घेतात. घेतलं तरी कितींना घरी बसून घ्यावं लागतं आणि किती मुलींचे लग्न बस लिहिता वाचता येतं नं; झालं संपलं. शेवटी स्ञिचीच जात ती, आज ना उद्या लग्न करुन संसारच थाटणार, मग कशाला लागतया शिक्षण? या निकषावर चक्र चालतं. दुसरीकडे लग्नानंतरही स्ञियांमध्ये शिक्षणाची जाणीव जागृत होऊन त्या शिक्षण घेता आहेत ही गोष्ट या गोष्टीवर पांघरुण घालते. पण मुद्दा स्वातंञ्याचा येतो. सावित्रीबाईंनी स्ञीमुक्तीचा लढा दिला तो फक्त शिक्षणापुरता नाही तर त्या शिक्षणातून जाणीव निर्माण होऊन स्ञीला स्व-स्वातंञ्याचं महत्व उमगावं यासाठी सुध्दा. परंतू आजही माझी स्ञी स्वत:मधलं सामर्थ्य ओळखू शकली नाही ये. स्वातंञ्य म्हणजे बाहेर फिरणं नसतं तर स्वातंञ्य समान विचारात असतं. स्वातंञ्य मत मांडण्यात असतं. स्वातंञ्य कुटूंबातही असतं पण स्ञीने स्वत:ला इतकं संवेदनशील आणि दुबळं करुन ठेवलंय नं की, ती स्वतः कितीही ञासातून गेली तरी चालेल पण तिचे कुटूंब, नातेवाईक दुखावले जायला नको.

 लग्न होणं म्हणजे खरंतर नियमाच्या गराड्यात अडकनं नसतं पण आज तोच अर्थ काढला जातो. आईबापाकडून दुसऱ्यांच्या घरात ती मुलगी पाऊल टाकत असते पण इकडे रुबाब दाखविणारी पोर माञ आईबाप समोर असले तरी त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलायलाही सासू-सासरे, नवरा यांची अनुमती घेते. मी म्हणते का असं असावं. तिने तिचं व्यक्तिस्वातंत्र्य बाजूला ठेवून का हे हात पाय नसलेले नियम पाळावेत. ती काय मोलकरीण आहे की बंदिस्त गुन्हेगार? पण हा प्रश्न त्या शोषित स्ञीला पडतच नाही. मुकाट्याने एखादी शिकलेली मुलगीही सासरची मंडळी म्हणून हे नियम पाळत असते. परंपरागत चालत आलेल्या कुटूंबाच्या नियमात बसून सुनेने वागावं. यालाच खरं तर कौटूंबिक भाषेत स्वातंत्र्य म्हणतात. अजून एका वाक्याची मला इथे आठवण करून द्यावीशी वाटते. मुलीला उत्तम स्थळ आले. मुलगा शिकलेला तर आहेच त्याचबरोबर घरी इतकी गडगंज संपत्ती आहे हे की, मुलीच्या पायाशी सुख लोळण घालेल. ही बातमी साऱ्या गावात हर्षानं सांगताना आईवडील म्हणतात, मुलाकडची मंडळी म्हटली की, आमच्याकडे तुमच्या मुलीला  घराबाहेरही पडण्याची गरज नाही. तिला सगळं हातात मिळेल. आमची  मुलगी घरात राज्य करेल. हे वाक्य म्हणतांना ते आनंदी होतात. माञ एका वडीलांचा पिता म्हणून, एक पुरुष म्हणून आणि एक स्ञी म्हणूनही या वाक्याची लाज वाटावी. जर त्या मुलीला शिकून सवरुनही फक्त गडगंज श्रीमंती आहे म्हणून  सगळी सुखं घरातच मिळणार असतील तर त्या सुखाचं मोलच काय; अडकणार ती चौकटी आतच.अपेक्षा काय फक्त मुलीनी सगळा संसार सांभाळून घ्यावा. त्याउपर शिकलेल्या मुलाला त्याच्या तोलामापाचा हुंडा द्यावा लागतो हा विषयच वेगळा. हुंडा देतांना आणि घेतांना माञ शिक्षणाच्या बदल्यात शिक्षण बघितलं जात नाही. परिणामी हा विचारही कोणाच्या डोक्यात येत नाही. मग मुलगी उच्चशिक्षित असली तरी फरक काय पडतो. यात काही नवल नाही. कारण आपल्याकडे असा दुरगामी विचार कुणी रुजवलाच नाही. कोणी रुजवायचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्यावर बोटच उगारले जातात. मग अगदी स्पष्टोक्तीने सांगायचं झालं तर एवढं शिकून सवरुन तुम्ही घरातच राहिला आहात आणि घरातील सगळी जवाबदारी सांभाळता आहात तर तुम्ही मोलकरीण म्हणूनच तिथे जगता आहात. मग एवढं सगळं बारा महिने अठरा काळ करून मिळतंय काय तर दोन वेळचं खायला जेवण आणि खर्चासाठी चार पैसे. त्यातही हिशोब विचारला जाणार. काय अर्थ त्या चार भिंतीला. पैसा, श्रीमंती सर्वस्व नसतं तर‌ स्व-स्वातंञ्य आणि समाधान महत्वाचं असतं माञ ज्या एका वाक्यासाठी आपल्याला आनंद मिळतो तो आनंद म्हणजे पुढे चालून आपल्यासाठी उबंरठ्यात अडकलेले पाऊल होतो. याची तसूभरही जाणीव सुरुवातीला आपल्याला होत नाही. 

विषय जवाबदारीचा नाही तर मोकळीकतेचा, विचारसरणीचा आणि लादलेल्या विषमतेतील अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा आहे. म्हणजे आजही जर कौटूंबिक पातळीवर, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर स्ञीच्या मागचा "अबला नारी" हा शिक्का अधिकच घट्ट होत असेल तर मग पुनश्च साविञीबाईंना नव्याने जन्म घेण्याची गरज आहे. आज जेव्हा एखादा नवरा लग्न झाल्यावरही आपल्या पत्नीवर संशय ठेवून तिला एकटीने बाहेर जाण्यास, मिञमैञिणींशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करतो तेव्हा तो नियम त्याच्यासाठीही वर्ज्य असावा असं तिला वाटतही नाही. एक प्रसंग असा की, रोज नोकरीवर जाणारा नवरा आपल्या मुलांना शाळेत सोडवून रोज बाहेर जातांना घराला बाहेरुन टाळा ठोकून जातो. तोंड दाबून ती बुक्क्याचा मार सहन करते. कसलीही चुक नसतांना. काय म्हणावं अशा विकृतीला तेही २१ व्या शतकात. हे ऐकतांना जितकं वाईट वाटतं त्यापेक्षाही भयकंर हे वास्तव आहे. त्या महिलेची या गोष्टी सहन करण्याची सहनशील वृत्ती स्वत: मध्ये अंगिकारावी की तिचा खेद व्यक्त करावा. याचं उत्तर कोणीतरी द्यावं. अंगावर काटा येतो हे असं वास्तव ऐकतांना.‌ पण दुर्दैवाने या काट्याचं कुंपण तोडण्याची बुध्दी माञ त्या स्ञियांना होत नाही. कारण इतकी वर्ष त्या काट्यांचे रुतणे आणि त्यांच करुप होऊन त्यानिशी वावरणं त्यांना कधीच चुकीचंच वाटलं नाही. रीतच ती म्हणून मलम लावून आभासी स्वातंञ्याच्या पारतंञ्यात त्या हसत-हसत आयुष्य जगत आहेत. मी माञ गुरफटलेय त्यांच्याच प्रश्नात. 

सरकारी हुद्यावर खुर्चीत  बसली असती का?
फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?

हे गाणं आज जोरात वाजतंय पण या मुली ज्यांच्यामुळे शिकल्या त्यांनी सगळ्या बंधनांना झुगारुन आपली वाट घडवली. शेणाच्या गोळ्यांनी साडीवर एकेका मुलीच्या जीवन उध्दाराच्या फुलांचे नक्षी त्यांनी कोरले. दगडाचे वार पाटीवर खडूने ज्ञान गिरवून ढालीप्रमाणे झेलून परतावून लावलेत. हे सगळं त्यांनी पारतंञ्याच्या काळात केलं. 'स्व'ची जाणीव करुन घेतली. त्याही स्वार्थी झाल्या पण का? तर स्वत:ला घडवून दुसऱ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी. मग आज तर त्या मानाने सगळं सोप्पं आहे. मुख्य म्हणजे संविधानाचा आधार पाठीशी आहे. अधिकार माणसांनी, समाजाने नाही तर संविधानाने दिलेत ते सर्वांसाठी समान असूनही आज आपण स्ञी म्हणून वेगळेच नियम का पाळतो? कोणताही निर्णय घेण्याआधी सगळ्यांचीच गरज नसतांना अनुमती का घ्यावी लागते? असे प्रश्न विचारा कधीतरी स्वत:ला. आहे नं मी ही माणूस? सृष्टीची निर्माती मीच नं? मग मी का? नाही स्वत:साठी, स्वत:च्या आरोग्यासाठी थोडं स्वार्थी व्हावं. का? नाही मी कधीतरी  स्वत: सोबतच कोणालाही नं सांगता वाटेल तिथे जाऊन वेळ घालवावा? आज खरच समाजाच्या आतच्या या अक्राळविक्राळ विचारप्रवाहात अडकलेल्या लोकांना खऱ्या प्रवाहात आणण्याची गरज आहे जो साविञीबाईंनी स्ञियांसाठी वाहता केला. त्यात पडलेले बांध जेव्हा तुटतील ना तेव्हा साविञीबाईंसारख्या अनेक स्ञिया सक्षमपणे  जगाचा डोलारा पुढे नेण्यात मोकळीकतेने हातभार लावतील. 

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

 सावित्रीबाईंनी बाईंचे हे उदगार आज चौकटी आत नसलेले नियमही डोळ्यांवर झापड टाकून पाळणाऱ्या स्ञियांना व विषमतेच्या दृष्टचक्रात अडकून राहिलेल्या समाजवर्गाला तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच एक स्ञी जेव्हा संपूर्ण स्ञी जातीसाठी मागे पुढे न पाहता उभी राहिली तेव्हा तिने कुठल्याही विशिष्ट समाजासाठी नव्हे तर फक्त स्ञी जातीसाठी उभी ठाकली. विशेषतः त्यांच्यासाठी तेव्हाची ती स्ञी जात म्हणजे अजात होती. म्हणजे कुठलाही जातीभेद त्यांनी मान्यच केला नाही. म्हणून त्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका "क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले" म्हणून अजरामर झाल्या. आज प्रत्येक घरात शिक्षित सावित्री आहे ती याच साविञीमुळे. लक्षात ठेवा तुमची मुलगी ही तुमचं प्रतिरुप असते. तुम्ही तिला जे दाखवाल त्याच विचारांचा पगडा तिच्यावर असेल. त्या मातीच्या गोळ्याला स्व-स्वातंञ्याचा आकार‌ द्या तुम्हीही तसंच जगा म्हणजे तिचं‌ जगणं सोहळा असेल. मग ती स्वच्छंदी होऊन, अजात होऊन पारदर्शकरित्या हे जग बघेल. सगळं सांभाळेल‌ पण स्वत:ला नं गमावता. त्या दिवशी माञ हे विश्व कधीही मागे वळून बघणार‌ नाही कारण त्याचं सारथ्य करणारा स्ञी वर्ग आणि पुरुषवर्ग एका समान विचारधारेवर समन्वय साधणारा असणार...
 शेवटी फक्त इतकेच मनापासून सांगू इच्छिते की, साविञीबाई हे नाव फक्त आठवणीत न ठेवता स्ञी म्हणून पुनश्च विचाराने जन्म देऊन प्रत्येक स्ञीच्या आचरणातही जन्म द्यायला हवा. हेच साविञीबाईंना खरे अभिवादन ठरेल!

                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

पुरुष सत्ताक समाज???

                        पुरुष सत्ताक समाज???
लेखाची सुरुवात कशी करु मला काही उमजेना, काट्याकुट्यातल्या  पुरुषाला  जाणणं मला काही समजेना...!
अशाच भावना असतात ना आपल्या पुरुषांविषयी. पुरुषांचं जीवन हे काट्याला समर्पक आहे. काटा नेहमीच आडवळणात वाट अडवतो, लक्ष नसलं तर‌ तो कचकन टोचतो. माञ, पुढे पाहिलं तर त्या काट्याचं टोचणं काही क्षण झोंबतं, कारण त्याने पुढच्या संकटापासून आपल्याला सावध केलेले असते. काट्याच्या रस्त्यावर काट्यांचेही फुलं करणारे हात आपल्याला अलगद रस्ता पार करवून देतात अन् स्वत: माञ‌ तो होतो काट्याकुट्यातला पुरुष आपल्याचसाठी! आजच्या जगातलं वातावरण इतकं गढूळ झालंय ना की, येथे होणारे प्रदूषित वातावरण हे मानवाच्या अविचारीपणाच्या, तर्कटी स्वभावाच्या आणि द्वैषभावनेच्या वृत्तीमुळे आहे. या प्रदूषणाने डोळे इतके अंधारले आहेत ना की, त्यामुळे नेमकं चांगलं काय अन् वाईट काय ही समजण्याची प्रवृत्तीच लोकांमध्ये उरलेली नाही. ते म्हणतात ना, गव्हासोबत किडेही रगडले जातात, तश्यातलंच हे. 

पुरुष जात म्हणजे वाईटच, पुरुष जात म्हणजे वर्चस्व आणि पुरुष जात म्हणजेच जबरदस्ती साधारण असा समजच सर्वश्रूत आहे. यामुळे त्यांना समजून घेण्याआधीच त्यांचा निकाल लावून आपण मोकळं होऊन जातो. परंतू नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत तशाच या सृष्टीचक्राच्या दोन बाजू म्हणजे स्ञी आणि पुरुष. या जगाच्या पाठीवर स्ञी आणि पुरुष असे दोन‌ मानवरुप आहेत. पुरुष ही त्यातील जमेची बाजू. सगळं सांभाळूनही अलिप्त असणारा व्यक्ती म्हणजे पुरुष. आपण सहज बोलून जातो; ती काय त्यांची जवाबदारी होती. तो घरातला कर्ता पुरुष, तो नाही सांभाळणार तर मग काय गाव लोकं येतील? बस सपलं. असे दुषणं देत पुरुषाच्या मेहनतीला जवाबदारीचं ओझं लावतो अन् साधे त्याला दोन धीराचे शब्दही देत नाहीत. 

स्ञीला जसे जन्मापासून कष्टच असतात तेच कष्ट अगदी पुरुषाच्याही मार्गात‌आहेच की, छोट्याशा वयात आईला घरातल्या कर्त्यासारखं दळणाचा डबा आणण्यापासून मदत करत तो जवाबदारीच्या संस्कारात घडतो. पुढे तोच आई बाबांचा आधार‌ ते भाऊ बनून आपल्या बहिणीचा पाठीराखा होतो. गृहस्थाश्रमात प्रवेश करतांना आपल्या कुटूंबासह आपल्या सहचारिणीच्या कुटूंबाचीही जवाबदारी स्वीकारुन त्यासाठी मेहनतीची कसोटी लावणारा तो नवरा, जावई अशा अनेक नात्यांच्या बंधनांचा हसतमुखाने स्वीकार करतो. पुरुष म्हणजे नारळासारखा टणक आणि आतून नरम असा उल्लेखला जातो. माञ यात मला पुर्णतः विरोधाभास जाणवतो. खरतर पुरुषांपेक्षा हळवं या जगात कोणीच नाही. अगदी स्ञीसुध्दा याबाबतीत मागे पडते. हे नुसतं वाक्य नाही तर ही अनेक सर्वेक्षणातून  समोर आलेली बाब आहे. तसेच आपल्यातली निरीक्षणक्षमताही आपल्याला याचा ठाव देते. फक्त फरक एवढाच की, तो आतून रडतो. तो आतून तुटतो, तोही थकतो माञ तो ते सारं काही लपवून ठेवतो आपल्या जवाबादारीच्या डोंगरापल्याड. कसा ठाव लागेल सांगा? 

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्ञीशक्ती असते माञ माझ्या मते प्रत्येक स्त्रीच्या यशस्वी कारकिर्दीच्या पुढे पुरुष असतो असं म्हटंल तरी वावगं ठरणार नाही. कारण लग्नाआधी एक बाप म्हणून तो आपल्या मुलीला शिक्षणाची वाट दाखवतो. मिञ म्हणून  तो अडचणीत कामी येतो. प्रियकर बनून हट्टही पुरवितो आणि नवरा होऊन तोआयुष्यभराच्या सोबतीत पावलोपावली हातात हात घेऊन आयुष्याची सफर घडवून आणतो. थोडक्यात जी पुरुषीवृत्ती वाईट मार्गाला जावून स्ञियांच्या चारिञ्याची विटंबना करते त्याच विटबंना करणाऱ्यांचे हात काढून हातात देणाराही सत्पुरुष असतो. हे आपण विसरतोच. एक शरीराचा एक भाग निस्तेज असला तरी दुसरा तेजोमय असतोच तसंच पुरुषजातीचं. अज्ञानाच्या अंधकारात स्ञियांना शिक्षणाच्या प्रकाशात चुलीच्या धुरापलीकडेही जग दाखवलं ते पुरुषांनीच. अगदीच छञपतींच्या काळात शुरवीर रणरागिनींनी योध्दाभ्यासातून रणांगण गाजवले तेही पुरूषांमुळेच. 

पुरुष म्हणजे जळत्या निखाऱ्यावर चालणारा युग पुरुषच. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजेच खरा पुरुषार्थ. पुरूष हा या पुरुषार्थाच्या या पायऱ्यांचे पालन करत असतो. धर्म म्हणजे जात नव्हे तर कर्तव्य. बालवयात बुध्दीचे ग्रहण करणे, विद्याप्राप्तीसाठी श्रम घेणे व कुठल्या स्ञी वर वाईट नजर न टाकणे तसेच अंगात ताकद असतांनाही स्वत:वर ताबा ठेवून परिस्थिती समजून घेऊन मार्ग काढणे हा पुरुषार्थाचा परमधर्म आहे. अर्थ म्हणजे पैसा. अन्न, वस्ञ आणि निवारा या प्राथमिक गरजा पुर्ण करण्यासाठी व कुटूंबाला सुखी ठेवण्यासाठी सरळमार्गाने अर्थार्जन करणे हे पुरुषार्थाचे दुसरे लक्षण. तसेच अर्थ म्हणजे पैसा कमावणे होत असले तरी नाती असेल विद्या असेल ते  कमावून त्यांना जपणं हे ही याच पुरुषार्थात मोडते. काम म्हणजे उत्पत्ती अर्थात निर्मिती. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या जगाचे चक्र चालू राहण्यासाठी आपल्या कुटूंबाची वंशवेल वाढविणे व त्याचे संगोपन करणे हे पुरूषाचे आद्य कर्तव्य मानले जाते. या सगळ्यांचा शेवट म्हणजे मोक्ष अर्था‌त मृत्यू. या जगाचं एकमेव सत्य म्हणजे जन्म आणि मृत्यू. स्ञीत्व आणि पुरुषत्व हे आपल्या कर्तव्याच्या परिसिमा गाठल्यानंतर मोक्षाच्या दिशेने प्रस्थान करतात. हा पुरुषार्थाचा चारचाकी रथ हाकणारा  पुरूष खरच आयुष्यभर गुरफटलेला असतो तो आपल्या कर्तव्याच्या गर्तेत. हालाकीच्या परिस्थितीतही संध्याकाळी भाकरीसाठी ज्वारी आणतो. नसतांनाही पैसे कोठून आणतो? कळत नाही पण आणतो. मुलीचं लग्न हुंडा देत दणक्यात करतो खरं पण; नंतर  पोटाला चिमटा देत कर्ज फेडतो. शेतात पिक बहरतांना पाहतो, लेकरांना आनंदात पाहतो, अन् पिक कोलमडतांना स्वत: कोलमडतो पण तरीही लेकरांचा आनंद हरवू देत नाही तेव्हा तो शेतकरी बापही पुरुषच असतो. शहरात जावून नोकरी करतो, तिथे भलेही फुटपाथवर राहतो अन् दर महिन्याला घरी खुशाली सांगत पैसे पाठवतो तेव्हा तो पुरुषच असतो. अशा असंख्य छटा पुरुषांच्या आहेत. शेवटी काय तर स्ञिया रडून मोकळं होतात. पुरुषही रडतात, त्यांच्याही भावनांचा बांध फुटतो. माञ ते गांभीर्याने परिस्थिती हाताळतात. सगळं अगदी एकेरी सांभाळून घेतात. कारण पुरुष हे एक तत्व आहे. पुरुष भरलेल्या डोळ्यांमधील अश्रू ढासळत नाही तर ते पिऊन घेत खंबीरता दाखवतो. म्हणजे काय तर त्या झालेल्या अश्रुंचे तो विष पितो आणि रोज थोडं थोडं मरत जगत असतो. जगण्यातलं हे विष तो पितो‌ म्हणूनच बाकीच्यांना अमृताचा प्याला रिचवता येतो आणि याच विषातून अमृत वेगळे करतांना तो माञ एक दिवस विषामुळे धारातीर्थी पडतो. 

हे पुरुषांचं एकूणच जगणं असतं. मानसिकदृष्ट्या, शारिरीकदृष्ट्या, बौध्दिकदृष्टीकोनातून स्ञी-पुरुषांना समान पातळीवरच संघर्ष करावा लागतो पण; पुरुषांना आपण कधी समजूनच घेतलं नाही. कर्तव्य म्हणून आणि आपला कर्ताधर्ता म्हणून पुरुषांकडे बघण्याआधी एक माणूस म्हणून त्याच्या मनात शिरा. जेव्हा तो ढासळतो पण दाखवत नाही तेव्हा समजून घेऊन कधीतरी परिस्थिती बदलेल, असा आधार द्या. मग बघा न समजणारा पुरुषही आपले अंतरंग उलगडत कर्तव्यांपलीकडे जावून जगेल. 

आज जागतिक पुरुष दिनानिमित्त समस्त पुरुषवर्गाला  पुरुषदिनाच्या शुभेच्छा. गमतीत नेहमी म्हटलं जातं, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. पण; आज म्हणेल आणि मान्यही करेल जसं आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात ना तसं तुमची खंबीर साथ आहे म्हणून आम्ही आहोत आणि म्हणूनच या विश्वात झालेले सर्व बदल आहेत. पुरुषातल्या खेळकर मुलाला, मुलातल्या भावाला, मिञाला, प्रियकराला, नवऱ्याला अन् नवऱ्यातल्या बापाला व बापातल्या आजोबाला शतश्: नमन........!

        🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️

गुरुवार, ७ जुलै, २०२२

☔⛈️मन पाऊस पाऊस झाले...☔⛈️


          ☔⛈️मन पाऊस पाऊस झाले...☔⛈️

हा पाऊस मजला हरवून जातो पहिल्या वहिल्या भेटी
कोसळणाऱ्या धारांमधुनी जुळती शतजन्माच्या गाठी

मन पाऊस पाऊस झाले
मन तरंग पाण्यावरी न्हाले

माहित नाही काय ती जादू...पण पाऊस आणि माझं कनेक्शन काही वेगळंच भासतं मला. प्रत्येक पावसाची माझ्यासोबतची गाठभेट म्हणजे एक न्यारीच तऱ्हा.. रिमझिम पावसाने सुरुवात झालेल्या सरी मग हलकेच माझ्या मनालाही पावसाकडे चुंबकासारखं खेचतात... मीही ओढावले जाते नकळतच त्या बरसबरस बरसाणाऱ्या कोसळत्या पावसाच्या रागात. हळूच एक पाऊल टाकताच पहिल्या थेंबाच्या स्पर्शानेच जरा शहारायला होतं...माहित नाही का? पण तोही त्याच्या मुक्त बरसण्यातून माझ्याशी नुसताच बडबडत असतो. मीही एकून घेते. अलगद त्या थंड्यागार वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन पावसाच्या रागात मग्न होण्यासाठी सरसावते. आणि मनाच्या पटलावर उमटणाऱ्या रेखाटनात गुंग होतांना सभोवतालचा परिसर माञ माझ्यासाठी घुसर व्हायला लागतो. 
मग त्या पावसाच्या सरीत  बेधुंद बरसणारा धारांचा पाऊस आणि एकटीच मी....!
शांत तो एकांत, सोबतीला खुला आसमंत,
 निवांत क्षण आणि  आजूबाजूची निसर्गाची हिरवळ. त्यातच येणारा पावसाचा धाड धाड आवाज, 
डोलणाऱ्या  झाडांचा आपलाच एक हर्षोल्लास आणि त्या मनाच्या वलयात  निर्माण झालेल्या एकांताच्या रस्त्यात चेहऱ्यावर ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांनी शहाळलेली मी.......
बस्स! एक संवाद सुरू होतो...ना कोणाला समजणाऱ्या, ना कोणाला उमजणाऱ्या माझ्या मनाच्या हिरवळीत तो पाऊस स्थिरावतो. अनेक आठवणींच्या सरीत स्वत:लाच चिंब भिजवून घेतो. 
मनही माझेच आणि तो पाऊसही माझाच...

 उलट प्रश्नांची मग भरते जरा सभा. माझ्याच प्रश्नाची उत्तरे सापडण्यासाठी तो पाऊस राहतो तटस्थ उभा. प्रेम, मैञी माया, जीव, आयुष्य या सगळ्याच एकञित भावनांची माझ्यातलीच जाणीव मला करुन देण्यासाठी तोच पाऊस येतो. प्रत्येक वेळी येतो तेव्हा जरा वेगळा भासतो. मी माञ गुंतत जाते त्याच्या एक-एक थेंबात. हरवून घेते स्वत:ला त्याच्याच आवाजात...ना काळ न वेळेचे भान. असं वाटतं बस चिंब भिजावं आणि तसेच हात पसरवून गुज करावं माझ्या हक्काच्या पावसासोबत...
आभाळात कडाडणाऱ्या चमकदार विजांसोबत
अन् पावसाच्या प्रेमातून हिरवळ चढलेल्या त्या हिरवीशाल‌ पांघरलेल्या, नव्या नवरीचे रुप दाखवणाऱ्या लाजऱ्या बोजऱ्या निसर्गासोबत. या एकांतातल्याच संवादातून मग नकळत माझी कविता होते. अनेक पुसट  प्रश्नांच्या स्पष्ट दिसणाऱ्या उत्तरातून माझ्यातील नव्या भावनांची मलाच जाणीव व्हायला लागते. मग काय बरोबर, काय चूक या कसल्यास गोष्टींची तेव्हा तमा नसते. शेवटी मनच ते सैरावैरा पळणारे त्या पावसाच्या सोबतीने शांत होते. या सगळ्याच जाणिवेतून चेहऱ्यावर स्मितहास्य खुलते, मी माझ्यातच गुंग  होऊन माझी मलाच खुळी भासते. कवितेच्या ओळी मग झरझर येतात अन् पाऊस शमण्याच्या आत त्या पावसाचाच कागद होऊन ती  कविता चिंब भिजते. पावसाळा येतो, पावसाळा जातो पण मी माञ जेव्हा भिजते तेव्हा त्या पावसात शहारते. अंगावर आलेल्या काट्यांतून मनाच्या घट्ट कोपऱ्यात जावून सामावते. हे कधीतरीच होतं जेव्हा तो पाऊस बरसतो अन् त्या पावसात मी त्याची होऊन एकांतात मनाचा कोपरा शोधते. 
तो पाऊस थांबतो पण मी माञ तिथेच असते काही क्षण त्यातच अडकलेली. 
पावसाचे थेंब ओसरतांना माझ्याच मनाला सावरतांना..
तो भास आभासांचा खेळ खेळत सावरते त्या पावसातूंन अन् निघते मग त्या वाटेवरून एका कवितेचं देणं घेऊन... एक अलौकिक जाणिवेचं देणं...........
        
                            ‌‌🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

रविवार, ५ जून, २०२२

कचऱ्यात माखवलेला ऐतिहासिक वारसा......



काल मी आणि माझी मैञिण रसिका रोजच्या वळणापेक्षा थोडी आडवाट काढून विद्यापीठाकडे पानचक्की रस्त्याने जात होतो. घाटी पासून पानचक्कीचा रस्ता हा खरच आडवाटेसारखा चाळण झालेला आहे. मग काय, गाडीसोबत आम्हीही उड्या मारत मारत त्या रस्त्यावरुन जात होतो. रसिकाच्या भाषेत ये चल गं तु  एडवेंचर्स राईडची मजा घेत जाऊयात. मुळातच आम्ही पञकारितेच्या विद्यार्थिनी असल्याकारणाने बोलणार तरी दुसरं काय नं, आपोआपच आमच्या विचारांची देवाणघेवाण पञकाराच्याच नजरेतनं सुरु होते. 

ऐतिहासिक दरवाज्यांच्या शहरातील तो मोडकळीस आलेला त्यातला एक वारसा दिसला. अत्यंत संथ गतीने त्याचे पुनरुज्जीवन सुरू तर झाले आहे ,परंतू इतिहासाची ती पाऊलखुण नव्या रंगात येईल माञ, तो आतापर्यत जागा असणारा इतिहास पुढेही जागा राहील का ? हा प्रश्न आमच्या चर्चेचा पहिला भाग. सहजच ती म्हणते अगं तु पानचक्की बघितली आहेस का? म्हटलं नाही गं. एकलंय माञ भरपूर. आणि तिने चल तुला पानचक्की दाखवते म्हणत गाडीला ब्रेक लावला. आमचा दोघींचा संवाद ऐकून टिकीट घराचे काकाही आम्हाला दरवाज्याबद्दल माहिती सांगायला लागले. पोरींनो, हा दरवाजा मलिक अंबरच्या काकाच्या नावाने बांधला गेला. त्याकाळी चुना आणि त्यात समाविष्ट केलेल्या वेगवेगळ्या मिश्रणाच्या लगद्यातून हा दरवाजा उभा राहिला. म्हणून इतक्या वर्षांचे ऊन-पावसाळे त्याने सहज झेलले. मोठ्या प्रवेशद्वारातून आत जात मलिक अंबरची नहर असा उदघोष करत रसिकाने मला त्या जागेची ओळख करुन दिली. 
पण पण पण...बोलता बोलताच त्या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास ऐकत नहरच्या पानचक्कीच्या बाजूला पोहोचलो आणि त्याच इतिहासाला काळीमा फासत डाग लावणाऱ्या माझ्याच मनुष्यप्राण्याची मला भंयकंर चिड आली. रसिकाचा कॅमेरा सुरु झाला आणि अत्यंत गोड शब्दात तिने तिथले वास्तव दर्शन दाखवत औरंगाबादकरांनाच एक आरसा दाखवला. दृश्य असे की, भल्यामोठ्या त्या पाण्याच्या जलसाठ्यात, जो  जलसाठाच त्या पानचक्कीचे मुळ आहे त्यातच तुम्ही प्लास्टीकच्या बॉटल्स, काहीही खाल्लेला कचरा टाकता आहात? जमतं तरी कसं? ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, शहराची स्मार्ट सिटी करण्यासाठी, ५२ दरवाज्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी बेसुमार‌ पैसा खर्च होत आहे. आंदोलनं ही चालले आहेत. त्यात जर एखादा वारसा अजूनही समृध्द असेल‌ तर‌ त्यालाही पुनरुज्जीवनाच्या रांगेत उभं करणं यात कुठलं तथ्य आलं. त्यातील माशांना खाऊ घालण्याच्या तुमच्या आकर्षणापोटी त्या जीवांचा जीव कोदंट होत आहे. प्लास्टीकच्या तुकड्यातून कित्येक मासे मृत होऊ शकतात. एवढी साधी समज आपल्यात नसण्याइतपत मंद तर आपण नक्कीच नाही. 

आज जागतिक पर्यावरण दिन आणि आदल्या दिवशी ही पानचक्कीची मनाला कुनकुन लावणारी भेट. खरच अशाने पर्यावरण जपलं जाईल का ?हा  प्रश्न सकाळी उठल्या उठल्या कित्येकांचे स्टेटस बघून पडला आणि माझी लेखणी सरसावली ती, हा कल्लोळ शब्दबध्द करायला. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या सोबतच माणसाने पर्यावरणाशी पर्यावरणासम वागणे हा मुलमंञ आचरणात‌ आणणेच पर्यावरण अबाधित राखण्याची गुरुकिल्ली आहे. असो....माझं मन तर लिहून हलकं झालं माञ ऐतिहासिक स्थळी केलेल्या  कचऱ्यातून केव्हा प्रकाश पडेल याची शाश्वती माञ आता देणंच अवघड झालंय. आपण बघायला जाणाऱ्या ठिकाणीच कचरा करुन ती जागा सुशोभित करणे हे‌ ज्यांना पटतंय त्यांनी एकदा परत त्या ठिकाणी जावून स्वत:चं आत्मचिंतन‌ करावं...‌!
त्यातून जर काही चांगलं घडणार असेल‌ तर. जगाला ओरडून सांगायला विसरु नका‌.
बाकीच्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे अखंड जीवसृष्टीचा ऱ्हास एवढंच काय ते डोक्यात‌ घ्या. तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल.
रसिकासोबतची पानचक्कीची पहिली भेट माझ्यासाठी कचराभेट ठरली. पुढच्यावेळेस जाईल तेव्हा कचरा बाजूला झालेला असेल‌ या आशेत....

                       🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
 

सोमवार, ७ मार्च, २०२२

💝💝^^^अंजली^^^💝💝

                      💗  "तिचं जग"💗
मुहूर्त जागतिक महिला दिनाचा! तिचं जग हे खास सदर सुरू असतांना माझ्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपण रोज वेगवेगळ्या महिलांच्या विश्वात शिरुन तिच्याशी गुजगोष्टी करतो आहोत. तिची संघर्षातून यशाकडील वाटचाल, तिचं समाजकार्य, तिचं जीवन हे सगळंंच अगदी भारावून टाकणारं आहे. खरतर सगळ्याच महिलांचे त्यांच्या नियमित आयुष्याव्यतिरिक्त त्यांनी हाती घेतलेलं कार्य हे प्रत्येकीला एकमेकींशी जोडणारं पण तरीही वेगळं असं काहीसं आहे. अशी महिला जी या सगळ्या महिलांच्या कार्याचा भाग असेल ती जर महिलादिनाच्या दिवशी असेल तर 'तिचं जग' या सदराचा शेवट गोड नक्कीच होईल. आणि विचारांच्या कल्पनेतून आकृती उभी राहिली एका बहारदार, भारदस्त महिला व्यक्तिमत्त्वाची. 
तु कल्पना नवनिर्मितीची...
पेटावी जणु मशाल स्वप्न आर्ततेची...
एक दिशा, एक आशा तु या ऐतिहासिक शहराची...
ओळख तुझ्या परिचयाची, जिल्ह्याची आई
'अंजली' धानोरकरांची...

हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच एक चमक येईल. काम करण्यापेक्षा काम बोललं की, त्या पदावरील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपोआपच बोलायला लागते. औरंगाबाद जिल्ह्याचा अतिशय सराईतपणे आपल्या प्रसन्न मुद्रेने पदभार सांभाळणारे लेखक, पञकार, साहित्यिक, अभिनेञी‌, वत्कृत्व, सॉफ्टस्कील ट्रेनर, कर्तव्यदक्ष अधिकारी असे सप्तरंगांची उधळण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर.‌ महिलादिनी बघुयात अंजली धानोरकरांचं 'तिचं जग'! 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १९९८ सालच्या त्या वर्ग-१ च्या अधिकारी. अंजली धानोरकर यांचा जन्म जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे झाला. त्यांचे वडील हे तेथील एका बॅंकेत कार्यरत होते तर आई ही गृहिणी. त्यांचं मुळ गाव हे आताचं तालुका असणारं बदनापूर हे आहे. तेव्हा माञ ते छोटसं खेडं गाव होतं. त्यांचे ९ वी पर्यंतचे शिक्षण हे पैठण येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत झाले. त्यामुळे बालपणाचे टप्पे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवले. १० वी ची परिक्षा त्या परभणीच्या बाल विद्यामंदिरातून चांगल्या गुणांकाने उत्तीर्ण झाल्या. नंतर अंबडच्या मत्स्योदरी महाविद्यालयात १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उपरोक्त महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. लहानपणापासून त्या अतिशय चंचल आणि अभ्यासू होत्या. त्यांच्यातील तेच गुण हेरुन वडीलांनी त्यांना वाचनाची सवय लावली‌. १२वीत गुणतालिकेत छान क्रमांक असूनही मनाचा ध्यास घेत त्यांनी कलाक्षेञात प्रवेश निश्चित केला. आईवडील पाठीशी असल्यामुळे बाकीच्यांचा विरोध कारणी लागला नाही. पदवीनंतर समंजस आणि परखड विचारांच्या अंजली धानोरकर यांनी आपल्या याच विचारांना योग्य दिशा मिळावी, योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अभ्यासू वृत्तीतून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. याच अभ्यासाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अक्षरशः पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण करत त्या शासकीय महसूल सेवेत तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. पञकारीतेतून थेट अधिकारी पदी त्यांनी झेप घेत आपली जिद्द पुर्ण केली होती. आता वेळ आली होती स्वत:ला सिद्ध करण्याची. कारण त्या काळी प्रशासकीय अधिकारी म्हणून स्ञियांचे प्रमाण अगदी नगण्य होते. पुरुषीमक्तेदारी असणाऱ्या कार्यालयात ही महिला काय काम करणार? असा दृष्टिकोन सुरुवातीला तिथल्या कर्मचाऱ्यांचा असायचा‌. पण आपली जिद्द, बोलण्यातील आपुलकी आणि नियोजनबद्ध काम या पध्दतीने त्यांनी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांची वाटचाल नुसतीच यशस्वी नाही तर दिमाखात सुरू आहे. तहसीलदारापासून सुरु झालेल्या त्यांच्या कार्याचा आलेख विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी चे झेंडे रोवत औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.

 तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना घरच्यांनी जेव्हा त्यांच्या लग्नाचं बाशिंग काढलं तेव्हा येणाऱ्या स्थळांना अंजली धानोरकरांची नोकरी मंजूर नव्हती. मुळातच पुरोगामी विचारसरणीच्या अंजली यांनी स्पष्टपणे त्या स्थळांना नकार‌ देत मुलगी ही चार चौकटीच्या बाहेरही स्वत:चे अस्तित्व घडवू शकते असे सांगितले. इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल माञ कष्टाने मिळवलेली नोकरी तर सोडायची नाही याची त्यांनी मनाशी गाठ बांधली. समाजाची दुसरी बाजू तितकीच मजबूत आहे जिला मुलगी ही अभिमान वाटते. तसच काहीसं अंजली धानोरकरांबाबत‌ झालं. खरतर एक सोपोस्कार म्हणून त्यांनी ठिकाण बघितले कारण पुर्व अनुभवानूसार तर‌ आपण नकारच देणार असं त्यांना माहित होतं. माञ त्यांची गाठ ही अभय‌ धानोरकरांशीच बांधलेली असावी. अभय धानोरकर‌ आणि त्यांच्या आईवडीलांना अजंली धानोकरांच्या कामाचा अभिमान वाटला. कमी वयात त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल, त्यांच्या कर्तबगारीबद्दल पेशाने डॉक्टर असणाऱ्या अभय धानोरकरांना फार कौतुक वाटले. आणि अंजलींना 'धानोरकर कुटूंबात' येवून त्यांच्या या ध्येयाला खंबीर‌ साथ लाभली. 
  
त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतांना त्यांच्या कर्तबगारीचे, खमक्या निर्णयप्रक्रियेचे अनेक पैलू आपल्याला उलगडत जातात. आणि सुखाचा धक्का देत जातात. ज्या क्षेञात त्यांनी पाऊल टाकले त्या क्षेञाचे नंदनवन त्यांनी केले. त्यातलेच एक वन खात्यात वन उपजिल्हाधिकारी व वनजमावबंदी अधिकारी पदावर कार्यरत असतांना हा विभाग अगदी अडगळीत पडलेला होता‌;अधिकाऱ्यांमध्ये शिस्त नव्हती. त्यातील एकाने मॅडमला सल्ला दिला, काय तुम्ही, इथे येवून फायदा नाही. इथे काही काम चालत नाही. त्यावेळस अतिशय आत्मविश्वासाने त्या अधिकाऱ्याला त्यानी खडसावत सांगितले. " सर मी या खुर्चीवर बसून एवढे चांगले काम करुन जाईल की परत इथे येण्यासाठी अधिकारी तुम्हाला विनंती करतील". त्यावेळेस कदाचित त्या अधिकाऱ्यांना ते हास्यास्पद वाटले असेल माञ योग्य नियोजन पध्दतीने, उत्कृष्ट कार्यप्रणाली राबवत तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यातींल कार्यक्षमता त्यांनी ओळखली. त्यानुसार त्यांनी कामाचे वर्गीकरण केले. कष्टातून बदल‌ दिसून आला आणि काय तर औरंगाबाद वनजमावबंदी कार्यालय 'आयएसओ' नामांकन मिळणारे महाराष्ट्रातील पहिले वन कार्यालय ठरले. त्यांनी त्यांचा दिलेला शब्द खरा ठरवला. अशा पध्दतीचे आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त करून देणं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरव आहे. आणि या गौरवात खारीचा वाटा हा अंजली धानोरकरांनाच जातो‌.

सन २०१७ मध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रत्येक कामातील वेगळेपण घेरुन त्यात आपली छाप कशी उमटवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजली धानोरकर. इथेही त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत आपलं नाव इतिहासाच्या पानावर भल्यामोठ्या अक्षरात कोरलं. जगप्रसिद्ध वेरुळ येथील चारही केंद्रावर त्यांनी महिलांना प्रशिक्षण देत महिला जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेञीय अधिकारी, मतदान केंद्राधिकारी, केंद्राध्यक्ष, BLO या सर्व पदावर त्यांनी महिलांची नियुक्ती केली. एवढेच नाही तर सुरक्षेसाठीही महिलापोलिसांचीच नियुक्ती त्याठिकाणी करण्यात आली होती. अंजली धानोरकरांच्या मते जर देशाच्या सर्वोच्च पदी महिला असू शकतात तर‌ मग निवडणूक प्रक्रिया त्या का सुव्यवस्थित पार पाडू शकणार नाही. सुदैवाने जिल्हाधिकारी ही त्यावेळेला महिलाच होती त्यामुळे त्यांनी‌ हा उपक्रम राबवला. अगदी मशीन ऑपरेट करण्यापासून ते पोलिंग एजंटपर्यंत सगळंच महिलाराज होतं.‌ हे पाऊल उचलून त्यांनी जोखीम तर पत्करली होती; कारण ही भारतातील पहिली घटना होती. माञ अजंली धानोरकरांच्या अखत्यारीत ही निवडणूक अगदी लिलया पार पडली. महिलांची अशी प्रशासकीय व राजकीय साखळी संपूर्ण भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा घडून आली. आणि हा मैलाचा दगड यशस्वीपणे पेलला तो अंजली धानोरकरांनी. प्रशासकीय अधिकारी कसा असावा? या वाक्याचं दोनच शब्दात उत्तर म्हणजे 'अंजली धानोरकर'.
दबंग हा शब्द पोलिस महिलेला वापरत असले तरी हे विशेषण त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला अगदी चोखपणे लागू होते. कारण त्या कामातून‌ जनतेपर्यंत पोहोचतात. 

एक महिला जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या उपजिल्हाधिकारी पदावर. ना मागे ना पुढे ,काम थेट तोंडावर! एवढा मोठा जिल्ह्याचा सांभाळ करतांना स्वत:साठी वेळ काढणं हे खरच अवघड आहे. माञ या वाक्याला अंजली धानोरकर अपवाद ठरतात. एवढ्या व्यापातूनही त्यांनी स्वत:ला कलाक्षेञाशी अगदी सराईतपणे जोडून ठेवलय. त्यांच्यातील‌ साहित्यिका जेव्हा- जेव्हा बाहेर पडली तेव्हा- तेव्हा साहित्यक्षेञासाठी ती देणगी अनमोल ठरली. 'गट्टीफु' हा त्यांचा बालकवितासंग्रह फार प्रसिद्ध असून त्यांनी चौथ्या आवृत्तीपर्यंत मजल मारली. 'मनतरंग या त्यांच्या ललितलेखासंग्रहाने तर‌ अशी कमाल केली की, त्यातील‌ 'काहूर' हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीएससी, बी. एस.डब्ल्यु व बी.एफ.ए च्या द्वितीय वर्षाच्या‌ अभ्यासक्रमात सन २०१२-१३ पासून समाविष्ट आहेत. त्या स्वतः सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत. याचसंदर्भातील व्यक्तीमत्व विकासासाठी सॉफ्टस्किल हे त्यांचे पुस्तक वाचनीय‌ आहे. विविध शासकीय प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्कील मधील विविध विषयांवर प्रशिक्षण दिले तर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, कॉर्पोरेट विभाग अशा अनेक क्षेञांसाठी वेळ काढत त्यांनी सॉफ्ट स्कीलचे धडे दिले. यासोबत 'मला आयएएस व्हायच' हे त्यांच अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेले आहे. साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' या पुस्तकाच्या अभिवाचनाची त्यांच्या मधूर आवाजात रेकॉर्डींग ऐकली की आई-मुलाच्या नात्यातील तो निरागस संवाद डोळ्यासमोर चिञ उभे करतो. नामांकित वृत्तपञ मासिकातील त्यांचे स्तंभ लेखन तर पर्वणी ठरते. साहित्यवेड्या अंजली धानोरकरांच्या लेखणीने त्यांना खरच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेपले आहे. स्वत:ला काळाबरोबर त्या कशाप्रकारे सुसंगत ठेवतात याचा प्रत्यय 'Lets Talk Anjali' या त्यांच्या युट्यूब चॅनलवर येतो. त्या कामातून वेळ काढत स्वत;ची आवड जोपासतात. 'जिंदगी मिलेंगी ना दोबारा, मनभर इसे जिले यारा' ह्या ओळींमधील ओवी म्हणजेच अंजली धानोरकर. 

त्यांच्या सामाजिक कार्याचा वेग जाणून त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त आहेत. २०१९ मध्ये फेमिना मासिकात त्यांच्यावर 'Pillar Of Democracy' म्हणजेच 'लोकशाही आधारस्तंभ' या शीर्षकाने लेख प्रसिद्ध झाला. तो क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. लोकशाहीचा आधारस्तंभ ही स्तुतीसुमनं खरच गगनभेदी आहेत. त्यांच्या किर्तीचे गोडवे सातासमुद्रापारही मोठ्या अभिमानाने गायले जातात. याचं उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या ‘Thrive Global’ या मासिकात त्यांच्यावर प्रसिद्ध झालेला लेख. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वृत्तपञातून त्यांनी आपले लेख जगात पोहोचविले. खरच एका महिलेनं मिळविलेलं हे क्षितीजापलिकडलं यश आपल्या भारताच्या कुठल्याच कोपऱ्यात न मावणारं आहे. त्याला सामावून घ्यायचं असेल तर मनच लागेल आणि जेव्हा ते प्रत्येकाच्या मनात उतरेल ना तेव्हा अंजली धानोरकरांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांसारखे अधिकारी तयार होऊन कायदा व‌ सुव्यवस्थेतून कशा पध्दतीने विकास साध्य होतो. याची प्रचिती येईल. खडतर परिश्रम आणि मनात असणाऱ्या अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन प्रशासकीय सेवेबरोबरच विविध क्षेञाला आपल्या कलेतून संपन्न करत अंजली धानोरकर‌ यांनी आपली विशेष छाप सोडली. कधीही न पुसणारी अशी. सह्याद्रीच्या उंचीसारखं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व असणाऱ्या या ध्येयवेड्या नारीशक्ती साठी भारतीयांच्या माना शानेनं आणि अभिमानानं उंचावतात. त्यांनी एवढी मोठी उंची गाठली आहे माञ त्यांचा निर्मळ स्वभाव हा सर्वसामान्यांनाही आपलंसं करुन घेतो. त्यांच्या दरबारी सगळेच एकसमान असून कोणी शेतकरी जरी आला तरी त्या वेळ काढून तितक्याच आपुलकीने विचारपूस करतात. याला म्हणतात पतंगाची झेप आभाळाला टेकली तरी डोर माञ जमिनीशी कायम संधान साधून असते. 

अंजली धानोरकर सांगतात. " कायम कायद्याला धरुनच काम करायला हवं. आपली उंची गाठतांना अनेक प्रसंगांना महिला म्हणून सामोरं‌ जावंच लागतं माञ ध्येय मनाशी पक्क असलं की आपल्यातील भुक वाढत जाते. आणि नकळत ती ताकद आपल्यात निर्माण होते कोणत्याही गोष्टीचा निडर होऊन सामना करण्याची. तुमच्यातील क्षमतांना ओळखा, नकारात्मक लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील माञ तेच बळ समजत वाटचाल करत‌ रहा. यश तुमच्या पायाशी असेल. खरच अंजली धानोरकर म्हणजे प्रशासकीय क्षेञातील व्यापक असे विद्यापीठ. त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक महिलादिन पुरेसा नाही. प्रत्येक महिलादिनी गौरव व्हायलाच हवा अशी ही महिलांची शक्ती. प्रशासकीय क्षेञात पाऊल टाकू इच्छिणाऱ्या अनेक महिला, मुलींचं प्रेरणास्थान. या प्रामाणिकतेच्या चालत्याबोलत्या संवेदनशील पुतळ्याला महिलादिनी सलाम! 
                     
                            🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


रविवार, ६ मार्च, २०२२

💗 कुजबूज नाही तर स्वच्छंदी ती💗

                         💗"तिचं जग"💗

आज कोणतेही आढेवेढे न घालता थेट विषयाला हात घालते. कारण जो समाज काही गोष्टींची सार्वजनिकरित्या वाच्यता करण्याला बंदी घालतो त्याच समाजाच्या अज्ञानामुळे आज महिलांवरील लैंगिक अत्याचार तर वाढतातच आहेत माञ लैंगिक शिक्षणाची समाजात असणारी अज्ञानता यामुळे महिलापुरुषांना समसमान पातळीवर समस्यांना सामोरं जावं लागतं. मग विषय इथेच येवून अडतो‌ की बोलणार कोण? या गोष्टी काय‌ चारचौघात बोलण्याचा विषय आहे का? याच सगळ्या प्रश्नांवरील उत्तर म्हणजे आपल्या औरंगाबादच्या स्ञीरोगतज्ञ डॉ. रश्मी बोरीकर. या जगात प्रत्येक शारीरिक व्याधीचं निराकरण करण्याची क्षमता ही वैद्यकीय क्षेञात आहे. सहज कोणालातरी विचारलं की वैद्यकीय क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची नावं सांगा. अगदी सहज सांगून टाकतो न आपण. पण जेव्हा लैंगिक समस्येवर अनुबोधन करणारा डॉक्टर जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा माञ जीभ अडखळते. आज माञ बदल घडलाय तो शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत आणि ग्रामीण भागापासून ते आदिवासी पाड्यापर्यंत. आणि हा बदल‌ घडवून आणण्यामागे असणारे मजबूत हात म्हणजे डॉ. रश्मी बोरीकर. कुजबूज न करता स्वच्छंदीपणे शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांवर मोकळेपणाने त्या समाजात भाष्य करतात. त्यांचा या क्षेञापर्यंतचा प्रवास खरतर खुप गमतीदार आहे .सोबतच अगदी खुला आहे‌ या बंदिस्त क्षेञापेक्षा. बघूयात तिचा प्रवास 'तिचं जग' मधून...!

रश्मी बोरीकर यांचा जन्म नागपूरचा आहे कारण त्यांच्या आईचं माहेर हे नागपूरचं. त्यानंतरचं संपुर्ण बालपण हे त्यांचं औरंगाबादमध्ये गेलं. त्यापुढील शिक्षण हे सगळं औरंगाबादमध्येच झालं. इयत्ता १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण त्यांनी शारदा मंदिर मुलींच्या शाळेत घेतलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाची निवड केली व त्यापुढील वाटचालीसाठी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादमध्ये आपले MBBS चे शिक्षण पुर्ण केले. त्यांचे‌ वडील हे सरस्वती भुवन महाविद्यालयात अर्थशास्ञाचे प्राध्यापक होते तर आई ही सरस्वती भुवन मुलांच्या शाळेतून उपप्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. त्यांचे आजोबा श्रीनिवासराव सखारामपंत बोरीकर हे हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे अग्रणी नेते होते. तसेच त्यांचे वडील आणि आत्या यांनीही वयाचे १० ते१६ या वयोगटात‌ असतांना हैद्राबाद मुक्तीसंग्रामामध्ये तरुण पिढी म्हणुन काम करत आपले शौर्य गाजवले. घरामध्येच स्वातंञ्यसंग्रामात काम केल्याची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना घरातुनच आजोबा आणि समाजसेवेचे बाळकडू मिळाले. आजोबांनी आठवण काढतांना बोरीकर‌ मॅडम सांगतात की, त्यांच्या आजोबाचं वत्कृत्व फार छान होतं. त्याच्या बोलण्याची शैली त्या काळात फार‌ प्रसिद्ध होती. त्यामुळे त्यांच्यातील ते अंगभुत गुण आपोआपच बोरीकर मॅडममध्ये उतरले. त्यामुळे शाळेपासूनच वेगवेगळ्या वत्कृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि मग ओघानेच बक्षिसं. असं सगळं बालपण त्यांच औरंगाबादमध्ये व्यतीत झालेलं आहे.

खरतर बोरीकर मॅडमला स्वत: ला कधीच डॉक्टर व्हायचं नव्हतं. त्यांना कला क्षेत्रात आपलं करिअर करायचं होतं किंवा सायन्सला असतांना फिजिक्सबाबत निर्माण झालेली आवड यामुळे त्यातच काहीतरी संशोधनात्मक करावे असा त्यांचा मानस होता. पण त्या काळात वडीलांचा विचार असा होता की मुलींनी मुलींसाठी वैद्यकीय क्षेञ निवडणं अतिशय  चांगलं आहे. ओघाओघाने गुणही चांगले प्राप्त होत गेले आणि वैद्यकीय प्रवेश निश्चित झाला. प्रवेश घेतल्यानंतर मॅडमला या क्षेञात‌ येण्याचा कधीच पश्चात्ताप झाला नाही. त्यांना हे क्षेत्र आवडायला लागले. त्याचं शिक्षण सगळं घाटीत‌ झालं असल्यामुळे घाटीत येणारे रुग्ण हे खान्देश,मराठवाडा, विदर्भ अशा अनेक भागांतून येत असत. अक्षरशः राञराञ प्रवास करुन रुग्ण प्रसूतीसाठी घाटी मध्ये येत असत. आणि हे ज्या आर्थिक आणि समाजिक घटकातील नागरिक होते त्या भागात शिक्षणाची फार वाणवा प्रकर्षाने जाणवत असत. एका रुग्णाबरोबर‌ नातेवाईकांचा येणारा जत्था जेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर आहे हे कळताच त्या रुग्णाबरोबरची एक बाई सोडली तर‌ सगळे पसार होवून जायचे. त्यावेळेस माञ विद्यार्थीदशेत असतांना त्यांनी स्वत: रूग्णांसाठी रक्त देत ते लेबररुम पर्यंत पोहोचवत त्या महिला आणि बाळाला वाचविण्यासाठी आपल्या शिक्षकांची मदत करायची. या सगळ्यांमधून त्यांना लक्षात आलं की बायकांच्या आयुष्यात जो काही अज्ञानाचा अंधकार आहे‌ त्यांच्यासाठी आपण काहीतरी फार मोठं काम करायला हवं. मग त्यांनी ठरवलं की ,प्रसूती, सिझर,ऑबार्शन यांसारख्या गोष्टी तर सगळेच स्ञीरोगतज्ञ करतात. पण ही जी एक पायाभुत शिक्षणाची गरज आहे ती आपण करू शकतो का? आणि मग त्यातून फक्त‌ लैंगिक शिक्षण असं नाव न घेता त्यांनी त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्राप्त होईल असा प्रयत्न केला. जर यात शरीराची माहिती सांगितली जाईल,शरीराचं विज्ञान सांगितलं जाईल तर नक्कीच सगळ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलूच शकतो. मॅडम स्ञीरोगतज्ञ असल्याने त्या या गोष्टी अधिक शास्ञशुध्द पध्दतीने मांडु शकत होत्या तसेच त्यांच्यात असलेल्या वत्कृत्वाची सांगड आणि घराकडून मिळालेली सामाजिक जाणीव यामुळे या क्षेञात त्या बदल‌ घडवून आणू शकल्या. ज्या गोष्टी आजही डॉक्टर होतांनाच्या अभ्यासक्रमात शिकविल्या जात नाही, ते त्यांनी स्वत: अभ्यास करत जाणून घेतले तसेच दुसऱ्या देशात या शिक्षणाकडे कशापधदतीने बघितले जाते व अगदी सहजरित्या ते हे शिक्षण कसे देतात याचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला. आजपर्यंत बोरीकर मॅडम यांनी पाच मुली असणाऱ्या आदिवासी तांड्यावर‌ जावून सुध्दा मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले आहेत तर अगदी ४०० मुलींच्या समुदायात जावून ही त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. हे काम करत असतांना कुठेही आपला समाज काय म्हणतोय,आपली संस्कृती काय म्हणतेय या गोष्टी मध्ये न येवू देता शास्ञाने त्यांना काय शिकवलेलं आहे? शास्त्राने त्यांना शिकवलेली बाईची प्रजनन संस्था काय आहे? तिचं काम काय आहे आणि त्याच वेळेला शास्ञाने मला शिकवलेली पुरुषांची प्रजनन संस्था पण काय आहे? हे सगळं त्या वैद्यकीय दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहोचवतात. 
 
लैंगिक शिक्षणाची गरज ही फक्त महिलांनाच नाही तर‌ पुरुषांनाही त्या बाबतीत सजग असणं अगदी गरजेचं असतं माञ आपल्या समाजात ती मोकळीक नसते. तर डॉ. बोरीकरांनी ग्रामीण भागातील अनेक शाळेत मुलांशी बोलण्याचाही प्रयत्न केला.जर एक कार्यक्रम त्यांनी मुलींसाठी केला तर‌ दुसरा कार्यक्रम मुलांसाठी करणार असा त्यांचा आग्रह असतो.एवढेच नाही तर एक पाऊल पुढे जावून त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत‌ बोलावून आपल्या मुलांसाठी लैंगिक शिक्षणाबद्दलची जागृकता किती महत्वाची आहे हे समजावून सांगितले. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक मोकळीकता त्यांच्या कार्यक्रमांमधून निर्माण झाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी हे शिक्षण नसणं ही गोष्ट कारणीभूत आहे. कारण अल्पवयीन मुलीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा समोरची व्यक्ती तिच्या शरीराशी काय करतेय हे तिला कळण्याइतपत तिची समज नसते ना. तो अत्याचार आहे हेच तिला माहित नसतं त्यामुळे हे शाळेतूनच शिकवलं पाहिजे कारण आजही अशी परिस्थिती आहे की, आपण आपल्या आईवडीलांपेक्षा आपल्या शिक्षकांवर जास्त विश्वास ठेवतो. तर हे शिक्षण शाळेतून देतांना नुसतं मुलामुलींशी बोलून उपयोग नाही तर‌ त्यांच्या पालकांनाही विश्वासात घेणं गरजेचं आहे. आता कायद्याने प्रत्येक शाळेमध्ये पालकसंघ आहे. जेव्हा डॉक्टर बोरीकरांनी पालकांशी संवाद साधला तेव्हा ते इतके खुश झाले की ते मॅडमला म्हणाले मॅडम तुम्ही जे बोलता आहात ते जीवनशिक्षण आहे. ते लैंगिक शिक्षण आपण असं म्हणूच शकत नाही. असही नाही आहे की मुलांना शिकवलं की उद्या ते जावून लैंगिक संबधच ठेवणार. तर असं नाही ये. आपली तरुण पिढी ही खुप हुशार आणि समजूतदार आहे. त्या कृतीमागचं विज्ञान समजून घेणं आणि मग त्यावर विचार करणं हा अगदी वेगळा मुद्दा आहे. 
 
याला अनुसरुच एक मुद्दा म्हणजे मुलींच्या मासिक पाळीबद्दलचे समज-गैरसमज. आजही वर्षानुवर्षे चालत आलेल्या समज-गैरसमजांमुळे मासिक पाळीत महिलांना अस्पृश्य समजलं जातं. आजही त्यांना बाजूला बसवलं जातं तर काही समाजात घराबाहेर ठेवायला ही मागेपुढे बघितलं जात नाही. याबाबत डॉ.बोरीकर प्रत्यक्ष शिक्षकांशी संवाद साधत संपुर्ण प्रजनन संस्थेची आकृती फळ्यावरती काढून स्ञीबीज कसं तयार होतं? मृतपेशी काय असते. हे समजावून सांगतात. जर घरातील निर्णय प्रक्रियेत आई, वडील सगळेच असतात तर‌‌ मासिक पाळी बद्दल बोलतांना आजही जीभ का कचरते. मासिक पाळी म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी सगळ्यात सुंदर आहे. ज्यातून एक नवीन जीव‌ जन्माला  येतो. जो समाज मासिक पाळीत स्ञीला कमी लेखतो तो समाज त्या पाळीमुळेच आज या जगात आहे. हे माञ तो सोयीस्कर पणे विसरतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे आजही पाळी हा मुद्दा देवाधर्माशी जोडलेला आहे. बाईची पाळी ही प्रत्येकच धर्मात वाईट मानली गेलेली आहे. मुस्लिम धर्मात तिला नमाज पडण्याची परवानगी नाही, हिंदू धर्मात नमस्कार करण्याची नाही तर‌ बाकी कुठल्याच धर्मात प्रार्थनेची परवानगी नाही. मग जर कुठल्याही सजीवाचा जन्म हा त्या गर्भाशयातून आहे तर मग त्या गर्भपिशवीला वाईट मानायचं काय‌ कारण? आजही दुकानदाराला सॅनिटरी नॅपकिन मागायला मुलींना लाज वाटते. सॅनिटरी नॅपकिनचं पॅकेट ते वर्तमानपञात  गुंडाळून देतात.  का बरं असं? ज्या दिवशी मुलगी पाळीला पाप समजणार‌ नाही, ज्या दिवशी नवरा, वडील, मुलगा, मिञ तिच्यासाठी स्वत: जावून सॅनिटरी नॅपकिन आणून तिची त्या चार दिवसांत काळजी घेईल त्या दिवसापासून 'पाळी' हा शब्द नॉर्मल असेल. पण या सगळ्या दिशेनं होणारा बदल हा खुप सावकाश आहे. यावर बदल‌ घडवून आणायचा असेल तर शिक्षण ही एकमेव गुरुकिल्ली आपल्याला प्रत्येक कुलूपेचं ताळं तोडण्यासाठी उपयुक्त आहे. 

बोलत रहा,बोलत राहा समाजात सकारात्मकता पसरवत रहा. ताशेरे ओढले जातील माञ हेतू उदात्त असल्याने एक दिवस नक्कीच उजाडेल जेव्हा नावीन्यपूर्ण बदल‌ दिसून येईल. १०००० मुलींमागे दोन मुली जरी बदलल्या की मी आता पाळीत कुठलेही बंधन पाळणार नाही तरी यात माझं यश असेल असं डॉ. बोरीकर मॅडम आवर्जून सांगतात. 
बोरीकर‌ मॅडमच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश काळातील‌ जी आरोग्यव्यवस्था आहे तिच आपण पाळत आहोत. आपण आजही त्यात काहीही बदल केलेला नाही. जो सामाजिक शास्त्र हा विषय वैद्यकीय क्षेत्रात पुर्णपणे शिकवला जायला हवा तो पाहिजे तसा शिकवला जात‌ नाही. वैद्यकीय अभ्यासक्रम आता काळानुसार अद्यायावत करण्याची गरज आहे. शरीरक्रिया शिकवत असतांना माणसामाणसातील नातेसंबंध कसे असावेत. कुटूंबाला धरुन संबंध कसे असावे हेही त्यात अंतर्भूत केलं पाहिजे.

 दरवर्षी युनो ही संस्था महिलादिनाचे थीम देत असते. तर यावर्षीचं थीम आहे. 'CHANGE THE BUYEST' म्हणजे 'ग्रह बदलूयात'. मग आपल्याबद्दलचे ग्रह आपणच बदलूयात ना. बाई म्हणजे क्षमाशील, बाई म्हणजे नाजूक, बाई म्हणजे सुंदर, बाई म्हणजे प्रेमळ, बाई म्हणजे संवेदनशील, बाई म्हणजे सहनशील ही जी काही चौकट महिलांसाठी आखलेली आहे तर हीच आपण बदलूयात ना. मग आपण म्हणु शकतो मी एक महिला असण्याआधी मी एक माणूस आहे. आणि माणुस म्हणून सगळ्यांना असणाऱ्या भावना या आपल्याला सुध्दा आहेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्ञीला स्वत:ची ओळख आणि तिच्यातील अस्मितेची जाणीव होईल. ही सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी. खरच डॉ. रश्मी बोरीकर या जे शास्ञशुध्द पध्दतीतून लैंगिक शिक्षणाचे कार्य करत समाजात जागृकता निर्माण करता आहेत त्याला तोड नाही. त्यांच्या या कार्याला महिलादिनानिमित्त सलाम! 

   ‌                        🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

"सोन्यात माखुनही निराशा, कचऱ्यातुन मिळते तिला नवी आशा"

                        💗"तिचं जग"💗
आपल्या संस्कृतीची एक खुप वाईट सवय आहे. ती म्हणजे भेदाभेद. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, धर्मभेद हे जणु या पारतंञ्यात जखडून बसलेल्या संस्कृतीचे चार स्तंभच आहेत. जे उखडायचे प्रयत्न करणारेच दलदलीसारखे त्यात फसत जातात. कितीही जनजागृती झाली ,कळत असलं तरी वळवून घ्यायचं नसतं ही जणु गोचिडासारखी माणसाला चिकटलेली घाणेरडी सवय आहे. हे चार‌ भेद तर अभेद्यासारखे समाज पोखरायला उभे आहेतच. माञ त्यात‌ कमी की काय मानवनिर्मित कमीपणाचा भेदही त्याचबरोबरीने आता उभा रहात आहे. उच्चशिक्षित तरुण मोठ्या कंपनीत‌ नोकरी करतात तर ते साहेब उच्चवर्णीय, छोट्यामोठ्या कंपनीत‌ काम करणारे ते मध्यमवर्गीय आणि मग काय जे मोलमजुरी, कचराडेपोत ,भांडे घासून आपला उदरनिर्वाह करतात ते काय तर मग या मानवनिर्मित वर्णाचा भागच नाही. जे लोक फुटपाथावर काम करतात, कचरा वेचतात‌ त्यांना आपला समाज कमी लेखतो. 

पण काळ बदलतो; तो कोणासाठीच थांबत‌ नाही हे वाक्य माञ ते हा भेद निर्माण करतांना विसरलेच असणार यात दुमत नाही. आणि परिस्थिती बदलवणारा तो काळ होता कोरोना काळ. या काळात खऱ्या अर्थाने कोण या जगात सर्वश्रेष्ठ याची जाणीव करुन दिली. ज्या सफाई कामगारांना , कचरावेचक महिलांना आजपर्यंत कमी लेखण्यात येत आलं त्याच महिला अत्यावश्यक सेवा देत कोरोनायोध्दा झाल्या. कचरावेचक महिला याचं जीवन कसं असतं याचा साधा विचारदेखील आपल्या मनात कधीच‌ येत नाही. आपण तर आपल्या सेट आयुष्यात सुखी असतो माञ त्या अत्यंत कमी पैशात कचरावेचून आपलं आयुष्य जगत असतात. यात अनेक संघर्ष अगदी रोज उठल्यापासून त्यांची वाट बघत असतात. माञ दिवसाच्या शेवटी त्या समाधानी असतात. कसं बरं या आपल्या आयुष्यात संघर्ष असला तरीही समाधानी असतात? तर बघूयात आज कचरावेचक महिलेचं तिचं जग..!

खरतर या कचरावेचक आजी. दिवसभर औरंगाबाद येथील एका संस्थेद्वारे उभारण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रात कचरा वेचत आपला दिवस सत्कारणी लावतात. त्या आजींचे नाव तान्हाबाई अवचरमल. शिक्षण जेमतेम पहिली- दुसरी. घरी अत्यंत गरिब परिस्थिती असल्याकारणाने शिक्षण सोडून ‌बालवयात मोलमजूरी आजी करत असे. अल्पवयातच तान्हाबाईंचं लग्न झालं. सासरकडची परिस्थितीही बेताचीच. तेव्हा पाटलाच्या घरी त्यांचा दादला(पती) मजूरीला जात असे. दिवसभर राब राब राबून त्याकाळी वर्षाचे दोनशेच रुपये त्यांना मिळत असत. रोज मिळणाऱ्या मनभर दाण्यातून पोटाची खळगी भरणं खरच अवघड कारण त्याकाळी एकञ कुटूंबपध्दती असे. वरुन मागासलेला समाज म्हणत पाटलांचा रोष ओढवून घेणं ते वेगळच. आजी माञ स्वाभिमानी. त्यांनी त्यांच्या घरच्यांना ते काम सोडायला लावले. लोकांची गुलामगिरी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने कमावून खाऊ असं म्हणत‌ आजीने बाडबिस्तार गुंडाळत आपल्या पती व चुलत्यांसह रेल्वेने मुंबई गाठली. त्याकाळी रेल्वेला दहा रुपये तिकीट होतं. मुंबई, पुणे, रायगड अशा जिल्ह्यांमध्ये मोलमजुरी करत आजींनी आपल्या पतीला साथ दिली. तरुण रक्त असल्यामुळे त्या काळी आजीमध्ये ताकद होती. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी कुठं विटा उचल‌, कुठं सिमेंटचे टोपले उचल असे अनेक कामं केली. पण काळानुसार शरीरातील ताकद कमी झाली माञ गरिबीची झळ काही थांबली नाही. 

घरी शांत बसण्याची तान्हाआजींना सवय नसल्यामुळे त्यांना जेव्हा कचरा वर्गीकरण संस्थेच्या कचरावेचक कामाबद्दल कळालं तेव्हापासून त्या गोणी हातात‌ घेवून कचरावेचक महिला म्हणून काम करत‌ आहेत. संपुर्ण शहरातून येथे सुका कचरा आणला जातो. त्याचे वर्गीकरण करतांना व्यवस्थितरित्या त्यातील विक्रीयोग्य घटक बाजूला काढत संध्याकाळच्या सुमारास इथे असणाऱ्या सफाई साथींनी निवडलेल्या कचऱ्याचे धरमकाट्यावर मोजमाप केले जाते व‌ त्यानुसार‌ त्यांना दिवसाची मजुरी म्हणजेच त्यांच्या कष्टाचे पैसे दिले‌ जातात. हे पैसे दर रोजच्या मजूरीची नोंद करत आठवड्याच्या शेवटी त्यांना दिले जातात. त्यावर त्यांची उपजिविका भागते. तान्हा आजी म्हातारपणी काम करत आठवड्याला २- ३ हजार‌‌ कमवत कुटूंबाला हातभार‌ लावतात. त्यांची मुलगी, सुन आणि नात याही सफाईसाथी आहेत. त्यांची नात‌ ही अत्यंत हुशार आहे असं आजी आवर्जून सांगतात. कचरावेचक बनून काम करत‌ ती तिचा अभ्यास करत शिक्षण घेत आहेत. याचा आजींना अभिमान वाटतो. माझे दोन्ही मुलं शिकले नाहीत एक दारुही पितो माञ माझ्या नातींना जेवढं शिकायचं आहे तेवढं मी शिकू देणार असं आजी छातीठोक पणे सांगतात. 'जग आकाशात उडतं आपण निदान आपल्या मुलींना जमीन चालत यश गाठण्याची संधी तर देवूच शकतो ना!' हे अलौकिक उदगार त्या कचरावेचक आजींच्या तोंडून एकणं खरच त्यांना शिक्षणाचे कळालेले महत्व अधोरेखित करते.

कोरोनाकाळात जेव्हा काही दिवस त्यांना घरी रहावं लागलं तेव्हा त्यांच्या कचरा वर्गीकरण संस्थेनी घरपोच किराणा पोहोचवत त्यांची कशी काळजी घेतली या सगळ्या गोष्टी आजींच्या तोंडून ऐकतांना मन अगदी भारावून गेलं. कोरोना काळातही अत्यावश्यक सेवा देत तान्हा आजींनी जीवाची परवा न करता काम केले. खरच तान्हा आजी आणि त्याच्यासोबतच्या सगळ्या कचरावेचक महिला, सफाईसाथी म्हणजे देशाच्या खऱ्या योध्दा आहेत. सीमेवर जावून बंदूक घेऊन लढत नाही माञ कचऱ्यातून पसरणाऱ्या रोगराईला थांबवणाऱ्या सफाईसाथी आहेत. कोणालातरी ते काम करावंच लागणार‌ मग आजींनी केलं आणि त्यांच्यासारख्याच गरज असणाऱ्या अनेक महिलांनी केलं‌ तर काय‌ बिघडलं. आपण घरातला कचरा साफ करुन बाहेर‌ टाकतो; त्या‌ तोच कचरा उचलून‌ त्याचे योग्य वर्गीकरण करत देश स्वच्छ ठेवण्यात योगदान देतात. त्यातूनच मिळणाऱ्या चार पैशातून‌ आपली पोटाची खळगी भरतात. खरच घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करता- करता जर समाजातील वाईट विचारांच्या कचऱ्याचे, लोकांच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या उच्चनिच्चतेच्या कचऱ्याचे जर वर्गीकरण करता आले असते तर खरच त्या कचऱ्याची पार विल्हेवाट लावली असती. निदान देशाची या वाईट गोष्टींच्या कचऱ्यातून मुक्तता तरी झाली असती. 

कचरावेचक महिला या देशाचा अभिमान आहे. त्यांच्या कार्याला खरच सलाम! तान्हा आजींबद्दलचा तो संवाद खरच आजी-नातीचा संवाद झाला. त्या भरभरुन बोलल्या आम्ही फक्त ऐकत होतो. या वयातही दांडग्या उत्साहात त्या सफाईसाथी बनून काम करतात. तान्हा आजींना उंदड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महिला दिनाचा कचरावेचक तान्हाआजीसह सर्व सफाओ साथींना सलाम!

     ‌‌‌‌                       🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

 

शनिवार, ५ मार्च, २०२२

🏥"वैद्यकीय क्षेत्रातील कर्तबगार: डॉ. शिल्पा तोतला" 🏥

                   💗 "तिचं जग"💗
खरतर हॉस्पिटल‌ म्हटलं की सगळ्यांनाच भिती वाटते. पण आपल्या आजारावरचं एकमेव औषध म्हणजे डॉक्टर. तेव्हा माञ ते देवासारखे आपल्याला तारतात.डॉक्टर म्हणजे मनुष्य प्राण्यातला खराखुरा देव!

'आनंदी गोपाळ जोशी' हे नाव देशातील प्रत्येक महिला डॉक्टरच्या रक्तात‌ भिनलेलं एक शक्तीचं द्रव्य असणार. समाजाचा विरोध पत्करुन आपल्या‌ हिमतीच्या जोरावर दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण घेत भारतातील‌ पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान या दुर्गेने करुन दाखविला. जीवसृष्टीवरील प्रत्येक मनुष्यजातीच्या आयुष्याची डोरच जणु डॉक्टरांच्या हातात‌‌ असते. त्यातल्या त्यात‌ महिला डॉक्टर‌ होणं‌ सोप्पी गोष्ट नवे. पण आजची स्ञी ही समाजाला जाब विचारत आपल्या अधिकारांसाठी लढणारी काली आहे. आता ती तिच्या वाटेवर तिच्याच आकलनानुसार वळणे घेत आपल्याला आवड असणाऱ्या गोष्टीतून शिक्षण घेत स्वबळावर ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. हिरा हा सुरुवातीला म्हटलं तर‌ दगडच  असतो पण जेव्हा त्याचे अनेक पैलू पाडून तो समोर येतो तेव्हा अब्जावधीच्या किंमतीचा तो मानकरी ठरतो. स्ञी ही या श्रृष्टीवरील एकमेव‌ अशी मनुष्य प्राणी आहे जिचे या आयुष्याच्या प्रवासात हिऱ्यासारखे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. ती मुलगी असते, ती बहीण असते, ती माय असते, ती जिवकीप्राण मैञिण असते, ती बायको असते,ती आजीही होते आणि या सगळ्या जवाबदाऱ्या निभावत ती वेगळं नातं निर्माण करते ते स्वबळावर उभं राहण्याचं. तिथे ती अगदी सराईतपणे व्यवसायाची मालकीण असते, नोकरीत प्रमाणिक कर्मचारीही असते आणि समाजाची जाण असणारी समाजसेविकाही असते. हे  पैलू पाडणारा तो देव खरच किती उत्कृष्ट जोहरी असावा; कारण हा एकमेव हिरा आहे ज्याचे अनाकलनीय पैलू आहेत. असाच एक अस्सलिखित हिरा आज 'तिचं जग' या सदरातून आपण उलगडणार आहोत. 

नाव शिल्पा तोतला. आपण म्हणतो नावात काय आहे? पण खरच या नावात काय गम्मत आहे हे पुढे तुम्हाला नक्कीच उमगेल. जळगावसारख्या छोट्या जिल्ह्यात शिल्पा तोतलांचं बालपण गेलं. शिल्पा तोतला या लहानपणासूनच  अभ्यासात अत्यंत हुशार होत्या. घरात वातावरण अगदी वैद्यकीय क्षेञाचं होतं. त्यांचे आई-वडील दोघंही डॉक्टर होते. जेव्हा शिल्पा मॅडम आपल्या आईवडीलांची रुग्णसेवा बघायच्या तेव्हा त्यांना खुप अप्रुप वाटत असे. आपले आई-वडील रुग्णसेवा करत अनेकांच्या आजाराचं निदान‌ करतात. ही खरच मनाला समाधान देणारी बाब आहे. त्यावेळला त्या १० वीत होत्या. तिथेच त्यांना त्यांच्या आतला आवाज कळाला की , आपल्याला वैद्यकीय क्षेपञातच करिअर करायचे. आपल्या आईवडीलांचा आदर्श बाळगत त्या तयारीला लागल्या. इयत्ता १२ वीत त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले जेव्हा अथक परिश्रमांच्या जोरावर खांदेशातील एक नाही ,दोन नाही तर तब्बल ३ जिल्ह्यांतून त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. वैद्यकीय क्षेञात भारतात कुठेही त्यांना प्रवेश मिळणं शक्य होतं. त्यांनी मुंबईच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आणि जळगावसारख्या छोट्या जिल्ह्यातील ही मुलगी आपले स्वप्न उराशी बाळगून निघाली पुर्णत्वाच्या दिशेने. मुंबई सारख्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणारी जळगाव जिल्ह्यातील पहिली महिला होण्याचा बहुमानही शिल्पा तोतला यांनी आपल्या परिश्रमांच्या जोरावर आपल्याकडे खेचून आणला. १९९८ मध्ये MBBS सारखा किचकट अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केला. आणि शिल्पा तोतला या नावाला 'डॉक्टर शिल्पा तोतला' अशी भारदस्त पदवी मिळाली. हा प्रवास खरतर त्यांच्यासाठी खडतर‌ होता. कारण लहान जिल्ह्यातून आलेली मुलगी. मुंबईचे वातावरण झेपेल का? तिथे इंग्रजीमध्ये सहजरित्या चालणारे संभाषण आपल्याला जमेल का? मुळात ती संस्कृती मला स्वीकारेल‌ का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती‌ त्यांच्या मनात होती. पण त्यांच्यातील काही गुण हे इतरांपेक्षा  बळकट होते. त्यांची आकलन‌ क्षमता खुप चांगली असल्याने ‌त्या पटकन एखादी चांगली गोष्ट आपल्याकडे खेचून आणतात. याच कारणामुळे त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील महाविद्यालयीन प्रवास अविस्मरणीय राहिला.

 MBBS चे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी २००१पॅथॉलॉजीमध्ये शिक्षण पुर्ण केले. सुरुवातीलाच त्यांनी एमजीएम मध्ये पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम पाहिले. आपल्यातील जिज्ञासू वृत्ती घेरुन शिल्पा तोतला यांनी स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला.आणि 'कुशल पॅथॉलॉजी लॅबची' मुहूर्तमेढ औरंगाबादमध्ये रोवली गेली. यासोबत त्यांचे 'चिरायू चिल्ड्रन्स केअर' हॉस्पिटलही  लहान‌ मुलांसाठी काम करत आहे. आज औरंगाबादमधील कुशल पॅथॉलॉजी लॅबचा रिपोर्ट हा सर्वदेशात अग्रस्थानी मांडला जातो; एवढा तो विश्लेषणात्मक आणि परिपुर्ण असतो. याचे पुर्ण श्रेय हे डॉ. शिल्पा तोतला यांच्या सुव्यवस्थित शिस्तबद्ध संघटनाला जातं. त्यांची काम करण्याची पध्दत , त्यांचं रोजच्या कामाचं नियोजन या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन शिकावं ते फक्त कुशल पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावून. आज पॅथॉलॉजीमध्ये काम करुन अखंड रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. शिल्पा तोतलांना २१ वर्षे पुर्ण झालेत. पण त्या क्षेञातील नावीन्य त्यांनी अजुनही टिकवून ठेवलेले आहे. त्याचबरोबर त्यांचा छंद कुठेही त्यांनी मागे पडू दिला नाही. शिक्षण ,नोकरी आणि बाकीच्या अनेक गोष्टींबरोबरच त्यांनी नृत्य आणि संगीताची आवड खुप छान पध्दतीने जोपासली आहे. शालेय जीवनात त्यांनी कथ्थक या नृत्यप्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल‌ मारत पारितोषिक प्राप्त केले. तसेच स्वत:चे ज्ञान हे काळाबरोबर सुसंगत असावे या दृष्टीने त्या नेहमी स्वतः ला विद्यार्थीदशेतच ठेवतात. आणि सतत काही ना काही तरी शिकत असतात. त्याचबरोबर प्राध्यापिका म्हणूनही वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी काम केले आहे.

एक महिला जेव्हा काम करत असते तेव्हा ती अनेक जवाबदाऱ्यांसहित आपले काम उत्तमरित्या पुर्ण करत असते. यात जर‌ तिला तिच्या कुटूंबाची साथ मिळाली तर‌ मग यापेक्षा मोठं समाधान आणि यश तिच्यासाठी कोणतंच नसतं. शिल्पा तोतला मॅडमलाही लग्नानंतर आपल्या पतीची खंबीर साथ तर‌ मिळालीच पण आपल्या मुलांच्या डोळ्यात आईबद्दल असणारा तो‌ अभिमान खरच त्यांना अजून जोमाणं काम करण्याची ताकद देतो. घर आणि ऑफिस हे एकाच ठिकाणी असल्यामुळे डॉ.शिल्पा तोतला याचं घराकडे कधीच दुर्लक्ष झालं नाही. एका विशिष्ट वेळेनंतर जेव्हा डॉ. शिल्पा यांना अशी जाणीव‌ झाली की, आपली लॅब ही आता सुसज्ज झाली असून व्यवस्थित चालते आहे. आता गरज आहे आपण करत असलेल्या समाजकार्याला अजून गती देण्याची. त्यातून त्यांना एक लक्षात आलं की, डॉक्टरांनाच गरज आहे डॉक्टरांना योग्य ठिकाणी नोकरी शोधून देण्याची. डॉ. शिल्पा तोतलांना ही कल्पना सुचल्या नंतर त्यांनी लगेच हेडगेवार, धुथ हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अँडमिन्ससोबत यासंदर्भात विचारविनिमय केला असता त्यांनी क्षणार्धात सांगितले नक्कीच या क्षेञात उतरा. डॉक्टरांनाच उभं करण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. कारण डॉक्टरांच जग , डॉक्टरांची भाषा हे समजणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टरच असू शकते. तोपर्यंय वैद्यकीय क्षेञातला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे सहजरित्या त्या या क्षेत्रात उतरल्या आणि डॉक्टरांना जॉब प्लेसमेंट मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला व्यक्तीमत्व होण्याचा मान डॉ. शिल्पा तोतला यांच्या शिरपेचात रोवला गेला. या प्लेसमेंट अंतर्गत आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी डॉक्टर्स स्वत: मुलाखती घेवुन पाठवले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे खेड्यापाड्यावरती, ग्रामीण वस्त्यांवरती त्याचबरोबर भारतातील शहरांसह दुर्गम भागातही डॉक्टर्स पोहोचले आहेत.  जवळजवळ १ लाख डॉक्टर्सचा डाटाबेस त्याच्याकडे उपस्थित आहे. पुढील काही दिवसांत देशाबाहेरील वैद्यकीय क्षेञात डॉ. शिल्पा तोतला प्लेसमेंट मिळवून देणार आहेत. ही खरच भावी डॉक्टरांसाठी मोलाची संधी असणार हे आहे. ९ वर्षांपुर्वी सुरु केलेल्या या प्लेसमेंटला  Merirecruiters हे नाव डॉ. शिल्पा तोतलांच्या नजरेतून मिळाले. ही औरंगाबाद शहरासाठी खरच अभिमानाची बाब आहे.  

अजूनही वैद्यकीय क्षेञात‌ येवू इच्छिणाऱ्यांना आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रवेश‌ उपलब्ध नाहीत . तसेच भारताच्या तुलनेत दुसऱ्या देशातील वैद्यकीय शिक्षण हे त्यामानाने स्वस्त असल्याकारणाने भारतातील विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिकावे लागते. आपल्या देशात‌ वैद्यकीय  महाविद्यालयांची क्षमता वाढावी व जास्तीत जास्त डॉक्टरांना संधी मिळावी असा प्राजंळ विचार डॉ. शिल्पा तोतलांनी मांडला. डॉक्टर शिल्पा तोतला यांना रुग्णसेवा करतांना कधीच शहरातील समस्येकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या शहरात काय घडतय याबाबत त्या  सदैव जागृक असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॅगलोर सारख्या आयटी हब असणाऱ्या शहरात जिथे औरंगाबादचे बहुसंख्य विद्यार्थी, कामगार‌ काम करतात त्याच शहरात‌ जाण्यासाठी साधी विमानसेवा उपलब्ध नसणं ही खरच लाजिरवाणी गोष्ट होती. त्या विद्यार्थ्यांचे हाल‌ओळखत त्यांच्या स्वप्नांना पंख मिळावे‌ म्हणून डॉ. शिल्पा तोतला यांनी एक संघटना स्थापन करुन सतत प्रशासनाचा पाठपुरावा करत औरंगाबाद ते बॅंगलोर ही विमानसेवा सुरू केली. यावेळी त्या शहराच्या आणि देशाच्या घराघरात पोहोचल्या. 

डॉक्टर शिल्पा तोतला या महिलांबद्दल बोलतांना सांगतात की, महिला या दोन खांबासारख्या दोन गोष्टींमध्ये खुप मजबूत असतात. एक तर त्या खुप प्रामाणिक असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एकावेळी अनेक कामं करून शकतात. ही गोष्ट त्यांच्या रक्तातच असते. या दोन गोष्टींचा समन्वय झाला तर‌ नक्कीच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेतून स्ञी ही नक्कीच आपली कर्तबगारी गाजवू शकते. ती जर चार भिंतीच्या आतून बाहेर पडली तर तिच्या बाह्य शिक्षणातून ती आपल्या घरात बदल‌ घडवून‌ आणू‌ शकते‌. तिच्या व्यक्तिमत्व विकासाला अजून ‌चालना मिळू शकते. तर स्ञी ही कर्तृत्व गाजवण्यासाठीच जन्माला आली आहे आणि तिने तिचे कर्तृत्व गाजवायलाच हवे. शिल्पा तोतला यांनी अत्यंत कमी वयात आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर वैद्यकीय क्षेञाला नावीन्यपुर्णता प्राप्त करुन दिली. 

रुग्णसेवेसाठी सदैव‌ तत्पर असणाऱ्या शिल्पा तोतला यांना स्ञी शक्तीचे अनेक पुरस्कार ‌प्राप्त आहेत. त्यांच्यातील स्ञी शक्तीने वैद्यकीय क्षेञात नवे आयाम स्थापन केले. त्यांच्या या कार्याचा अभिमान‌‌ त्यांच्या आईला वाटावा आणि माझी मुलगी माझा आदर्श आहे असं म्हणावं यापेक्षा त्यांच्या कामाची अनमोल‌ अशी पोचपावती त्यांच्यासाठी कोणतीच नसेल. अशी ही आईचा आदर्श असणारी त्यांची कर्तबगार लेक ! डॉ. शिल्पा तोतला या कर्तबगार विचारांच्या आणि आचरणाच्या प्रगल्भ मुर्तीला महिला दिनानिमित्त शुभेच्छा...! त्यांच्या ‌या कार्याचा गौरव सर्वदूर पसरत राहो हीच सदिच्छा....!

                   ‌‌‌‌    🖋️‌‌ ‌‌प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

❤️अनाथांच्या आशेचा किरण; "कविताआई"❤️

                         💗"तिचं जग"💗


तिचं जग! या महिलादिन विशेष सदराच्या सुरुवातीला आपण मायेच्या वलयात भ्रमंती करुन आलो. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची व्याप्ती ही पुढील‌ हजारो वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात अजरामर असणार आहे. पण हा इतिहास वाचणं आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणणं हे कोणाच्या अंगवळणी पडत‌ नाही. मग काय, समाजहिताचे ते कार्य इतिसाच्या पानावरच निरंतर आपल्या वाचनातून जिवंत असते. माई निवर्तल्या पण त्यांच्या कार्याचं या वलयला अजूनही सिमा नसणार ये, हा प्रत्यय तुम्हाला आपल्या औरंगाबादमध्ये येईल जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या अतोनात मातृत्वाने भरलेल्या वात्सल्याच्या मुर्तीला भेट द्याल.

आई, हे साम्राज्य डोळ्यांच्या दृष्टीत सामावणारं नाही. ज्यांना ह्या साम्राज्याच्या सुरक्षित पटलाखाली जगण्याची संधी मिळते  त्यांना या अमृताची गोडी रोज त्यांच्या आईच्या, कुटूंबाच्या सहवासात प्राप्त होत असते. पण शेवटी जीवनचक्र आहे ते कोणासाठीच समान नसते. दु:ख, यातना,संघर्ष ,आनंद, जिव्हाळा हे प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जगण्या अविभाज्य भाग असला तरीही काहींच्या माञ जखमांवर फुंकर घालण्यापलीकडे त्यांचं आयुष्य खडतर असतं. त्यात अजूनही स्ञीजन्म आपल्या समाजात काही प्रमाणात कलंक मानला जातो हे कटु सत्य आहे. अशा निरपराध मुलींचा जन्म झाल्यापासून कचऱ्याच्या डब्यात तर कधी फुटपाथावरुन त्यांचा हा प्रवास सुरू होतो  आणि गोंधळलेल्या अवस्थेत तो निष्पाप जी माञ पोटापुरत्या अन्नासाठी भटकत असतो. आपण असं का भटकतोय? हे समजण्यापलीकडची त्यांची बिकट अवस्था असते. पण  आयुष्यात जसे दु:ख देणारे असतात तसेच त्याच दु:खावर सुखाचे पांघरुन घालणारे ही जन्माला येतच असतात. तर हेच वात्सल्याचे पांघरुन घालून या निराधार मुलींच्या आयुष्याला उबदार करण्याचे काम औरंगाबादमधील अनाथांची माय 'कविता वाघ' करता आहे. तर‌ जाणुन घेवुयात याच मायेचं तिचं जग!

कोणतेही कार्य हाती घेण्याआधी आपण त्या परिस्थितीतून प्रवास केलेला असतो. असाच अनुभव कविताईंना आपल्या बालपणात आला आणि त्यांच्या हातून निराधार बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कविताईंचे संपुर्ण बालपण हे कन्नड तालुक्यातील मेहगाव येथे ४३-४४ लोकांच्या कुटूंबात गेले. त्यांचे आजोबा हे गावचे पोलीस पाटील असल्याने गावात‌ त्यांचे संबंध सलोख्याचे होते. त्यांच्या आजोंबांकडे गावातील प्रत्येक समस्येचा न्यायनिवाडा होत असतांना कविताताईंवर त्या सगळ्या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम झाला. त्या अत्यंत बारकाईने आजोबा कशा पध्दतीने लोकांचे प्रश्न सोडवितात याकडे लक्ष‌ द्यायच्या. आपोआपच त्यांच्यात समाजाप्रतीची आत्मीयता निर्माण झाली व सामाजसेवेची मशाल नकळत त्यावेळेस त्यांनी आपल्या हाती घेतली. शिक्षणातून वाटचाल करत त्यांची जिद्दीने यश गाठले. अचानक विज पडावी तसा त्यांच्या आयुष्यात गडगडाट झाला जेव्हा‌ १९९६ साली त्यांचे वडील किसनराव घुगे यांचे अपघाती निधन झाले. काळा मोठा आला होता;कुटूंब पार‌ खचून गेले. कविताताईंना न पेलवणारं दु:ख झालं कारण बापाचं छञ हरपलं होत. क्षणार्धात ओळख पुसली गेली. ते तालुका प्रमुख असल्याकारणाने कुटूंबासह , गोरगरिबांचा आधारही संपला होता. कविताईंनी परिस्थितीचे गांभिर्य समजून घेतले आणि वडीलांच्या कार्यात झोकून देवून काम करण्याचा दृढ निश्चय केला.

कविताताईंनी सन १९९९ वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'जयकिशन शिक्षण संस्थेची' स्थापना केली. समाजात असलेली मुलींबद्दलची विषमता नेहमीच त्यांच्या मनाला खटकत होती. मुलगी ही समस्यांचे मुळ नसून समस्या सक्षमपणे हाताळणारा त्या समस्येचा पहिला आणि शेवटचा उपाय आहे असे त्यांचे ठाम मत आहे. आणि हेच मत प्रवाहात आणण्यासाठीचा त्यांचा पहिला प्रयत्न म्हणजे 'शांती कंप्युटरची' सिडको येथे स्थापना. यातून अनेक गरिब मुलींना या इंन्स्टिट्युट पर्यंत आणून कप्युटरचे शिक्षण देत स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. परिस्थितीला माञ हे मंजूर नव्हते. आर्थिक कारणांमुळे हे इंन्स्टिट्युट जरी बंद करावे लागले असले तरी हा छोटासा स्वल्पविराम होता. या आर्थिक परिस्थितीत त्यांचे पती त्यांच्या सोबत‌ खंबीरपणे उभे राहिले. समाजासाठी चांगले काम करतांना वाईट प्रवृत्तीचा सामना हा करावाच लागतो‌. पण त्यातून लढण्याची ताकद मिळते आणि याच ताकदीचा वापर करत कविताताईंनी औरंगाबादमधील सातारा परिसर‌ येथे 'भगवानबाबा प्राथमिक शाळेची' सुरुवात केली. परिस्थितीमुळे शिक्षणाची वाट अडलेले  विद्यार्थी, निराधार , अपंग विद्यार्थी यांच्यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. कोणत्याही समाजकार्यात फळाची अपेक्षा न करत झटत राहणाऱ्या कविताईंच्या कामाची‌ दखल त्यावेळच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली व तुम्ही वसतिगृह का सुरु करत नाही असा प्रस्ताव त्यांच्यासमोर‌ मांडत त्यांच्या कार्याची ही ज्योत ज्वलंत करण्याची संधी त्यांना उपलब्ध करुन दिली. यातूनच २००५ साली त्यांनी कन्नड तालुक्यातील १४ गावांमध्ये सुसज्ज वसतिगृह निर्मिती करत ७०० विद्यार्थ्यांना ममतेचा हात दिला. पण तरीही मुलींचा प्रश्न कायम होता. निराधार मुलींना आधार देणं ही आपली नैतिक जवाबदारी आहे‌ या विचाराने त्यांना कधीच स्वस्त बसू दिलं नाही. सरकार दफ्तरी येरझाऱ्या घालत त्यांनी अखेर २००६-२००७ साली महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार महिला व बालकल्याण अंतर्गत ५० मुलींसाठी 'भगवानबाबा बालिकाश्रमाची' स्थापना केली. आज त्या बालिकाश्रमाला वटवृक्षाचं स्वरुप आलय.तिथं गेलं की तो मुलींचा निरागस आवाज, लहान वयात आलेला समजुतदार पणा पाहून एक आनंद निर्माण होतो सोबतच समाजातील परिस्थिती बघून अश्रूही तरळतात. काही दोष नसतांना या मुलींना निराधार शिक्का लागतो, निसर्गतः मिळालेले अपंगत्व समाजाची बघण्याची दृष्टी बदलवते, अनाथ नसूनही अनाथपण नशिबी येते. पण त्या मुलींना याच वाईट समाजात अभिमानाने ‌जगण्यासाठी कविताताई तयार‌ करतात.

बाहेरच्या जगात त्यांच्या याच मुली आज कर्तृत्व गाजवता आहेत. या मुलींचं संगोपन करणं खरच त्याच्यासाठी अवघड होतं पण एका आईने सगळं निभावलं. सुरुवातीला बालिकाश्रमाला अनेक खडतर‌ प्रसंगांना तोंड द्यावं लागलं कारण ५० मुलींचीच परवानगी होती. पण त्या कायदेशीर बाबींची झळ कधी मुलींना कविताताईंनी लागू दिली नाही. २००८-०९ साली जेव्हा बालगृहाची जाहिरात त्यांनी वाचली तेव्हा आश्रमाची मान्यता मिळवत निराधार‌ मुलांनाही मायेची साद‌ त्यांनी घातली. त्यावेळी भगवानबाबा आश्रमाध्ये मुली, योगेश्वरी बालकाश्रमामध्ये मुले तर गोकूळ व भगवानबाबा  बालकाश्रमामध्ये‌ मुले असे एकूण ४०० मुलामुलींचे आश्रयस्थान कविताताई झाल्या. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं म्हणतात. याच म्हणीला खोडत कविताईंनी तिन्ही जगातील‌ मुलामुलींना एकसंध करत वात्सल्याच्या कवेत त्यांना घेतलं. कविता ताईंच्या मुलींचा दिवस हा उठल्यापासून आव्हानं घेवून येतो.अगदी‌ सकाळी ब्रश करण्यापासून ते स्वत:ची तयारी करुन शाळेत जावून येई पर्यंत त्यांची परिक्षा असते. एखादं मुल जेव्हा बालिकाश्रमात‌ आणलं जातं तेव्हा त्याची मनोवस्था खचून‌ गेलेली असते. नेमकं आपल्यासोबत‌ घडतय तरी काय? हे आकलन करण्याइतपतही समज त्या लेकरांना नसते. तेव्हा फक्त गरज असते ती मातृत्वाची. त्या मुलावर झालेल्या मानसिक आघातातून त्याला बाहेर काढत‌ आश्रमात एकरुप होण्यात मदत करणं खरच सोप्प नसतं. पण माया लावली की वासरुही एक दिवस हंबरडा फोडत अश्रुंतून दु:खाला वाट मोकळी करुन देतेच.

या आश्रमाचा कविताताईंच्या अथक परिश्रमातून खुप विस्तार झाला आहे. त्यांच्या कार्याला सामाजिक संस्था,अनेक कुटूंब , महाराष्ट्र ‌शासन सदैव हातभार लावत असतात. कोरोना काळातील परिस्थितीतही कविताईंच्या या संस्थेला अनेक समाथिक संस्थांनी मदतीचा हात दिला. कविताताईंचा काळजी होती माञ मनात ठाम विश्वास होता की या संकटाला फाटकाच्या आत प्रवेश करू द्यायचा नाही आणि तसैच झाले. सर्वतोपरी काळजी घेत त्यांनी आपल्या लेकरांच रक्षण केलं. कविताताई आपल्या मुलींना उत्तमोत्तम शिक्षण मिळावं यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांना यश म्हणून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच पडत असते. आज या आश्रमातील कविताताईंच्या लेकी स्वबळावर इंजिनिअर, डॉक्टर, फार्माशिस्ट अशा अनेक क्षेञात बालिकाश्रमाचं नाव मोठं‌ करता आहेत. मुलांमधील‌ गुण ओळखून त्याच्या छंदाचं रुपातंर हे उपजीविकेत कसं करता येईल‌ याचं योग्य मार्गदर्शन हे‌ कविताताई आपल्या लेकरांना करत असतात. याच मुलींसाठी योग्य जोडीदार बघून त्या त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळवून देतात. यापेक्षा मोठं काय असू शकतं या मुलींसाठी. कविताताईंचा समाजकार्याचा हा आलेख खरच आकलनापलीकडच्या पातळीवर आहे. त्यांनी त्यांच्या मुलींना सर्व परिस्थितीशी तोंड देण्यासाठी सक्षम केलेले आहे. पण तरीही का बरं समाजात मुलगी जन्माला अजून विरोध आहे? का आपल्या आईवडीलांना मुलं वृध्दश्रमात पाठवतात? एवढी लोकसंख्या असतांना ही निष्पाप लेकरं निराधार का? तर‌ या परिस्थितीवर भाष्य करतांना कविताताई सत्यपरिस्थितीची जाणीव करुन देतात. मुलगी जन्माला येणं म्हटलं की आईवडीलांच्या जीवाला अगदी घोर‌ लागतो तिची सुरक्षा, तिच्या लग्नाचा खर्च, गरिब परिस्थिती असून तिच्या कल्याणासाठी अव्वाच्या सव्वा हुंडा या विचारानेच‌ ते खचून जातात. ग्रामीण भागात तर सध्या वातावरण एवढं खराब आहे‌ की आईवडील शेतात जातात पण मन‌ माञ मुलीमध्ये अडकलेलं असतं की ती एकटी घरी सुखरूप असेल ना? मग यावर उपाय काय तर मुलगीच नको; यामुळे समाजात विषमता पसरते. जर हुंडाबळीसारखी गुन्हा असूनही ही प्रथा अजून चालू असेल‌ तर कोणत्या बापाला आपल्या मुलीची काळजी वाटणार‌ नाही. जर या जगात तिला मुक्त फिरता येत नसेल तर कोणता बाप बेचैन होणार नाही. हुंडा देणं‌ आणि घेणं या गुन्ह्याला जेव्हा सरकार दरबारी कडक शिक्षेतून आळा बसेल तेव्हा माञ कोणत्याच बापाला आपली लेक ही भार‌‌ वाटणार‌ नाही. उलट एक मुलगी ही एका मुलांपेक्षा आईवडीलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. ज्या मुलीला नाकारलं जातं तिच बापाच्या काळजाचा तुकडा असते. पण या समाजातील हुडाबळीसारख्या कुप्रथांमुळे बापलेकीचं नात्यात दुरावा ही गोष्ट आली.

आपण ज्या घरात वाढतो त्या घरात होणाऱ्या संस्कारातून आपण घडत असतो. आपण कधी विचारच केला नाही की , एखादा मुलगा आपल्या पालकांना वृध्दाश्रमात  नेवून सोडत असेल‌ तर आपण त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की, काय हा मुलगा आईवडील सांभाळत‌ नाही. पण तो असंं का वागत असावा ही मनस्थिती आपण समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला का?त्याच्यावरती आधी तसे संस्कार रुजवले गेलेले नक्कीच असू शकतात.पण त्याच्यावर संस्कार होतांना कुटूंबातलं वातावरण जर त्याला तसं मिळालं असतं तर कदाचित त्याने ते पाऊल उचललं नसतं. यासाठी भांडवल, पैसा लागत नाही तर आपण करणाऱ्या कामातून मिळणारं समाधान महत्वाचं असतं. मनाची श्रीमंती‌ आणि आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी समाजाला देणं यापेक्षा दुसरं सुख नाही. मी, माझं यापलिकडे जावून विचार करण्याची शक्ती जर मुलांमध्ये निर्माण केली तसेच आपण समाजाचं देणं लागतो हे संस्कार जर आपल्या मुलांवर केले तर नक्कीच कोणत्याच आईवडीलांना वृध्दाश्रमाची पायरी चढावी नाही लागणार. कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. समाजातील परिस्थितीत खोलवर शिरून या गोष्टी का घडत असाव्यात हे शोधून काढले तर‌ नक्कीच समाजात परिवर्तन घडवून आणायला वेळ नाही लागणार. कविताताईंची समाजाप्रती असणारी ही जाण खरच विचार करायला भाग पाडणारी आहे. महिला व मुलींनी आपल्यात अंतर्भुत असणारी शक्ती  ओळखली पाहिजे. तिच्यातील उर्जेचा योग्य प्रकारे वापर करुन ती नक्कीच स्वतः च्या पायावर भक्कम पणे उभी रहात आपल्या कुटूंबालाही साथ देवू शकतेच आणि हे फक्त स्ञीच करु शकते. तर उठा, दुसऱ्यांसाठी जगता जगता एकदिवस आतमधल्या स्वत:च्या प्रतिमेला भेटा तुम्हाला नक्कीच तुमचं जग सापडेल. कविताताईंचा हा संदेश अगदी मोलाचा आहे. कविताताईंनी काम करतांना कधी स्वत:चा विचार केला नाही. सतत त्यांच्या मुलींसाठी त्या झटत असतात. एवढेच नाही तर २०१२ पासून त्या सातारा येथील पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा समितीत कार्यरत आहेत. यातून त्या समाजातील महिलांच्या प्रश्नाची सोडवणूक करत त्यांचे समुपदेशन करतात. त्यांचे आयुष्य सत्कारणी लावण्यात त्यांना मदत करतात.  त्यांचे कार्य हे कोणत्याच चौकटीत बसणारं नाही एवढं ते विलोभनीय आहे. कविताताईंच्या नावातील कविता ही त्यांचा प्रवास शब्दबध्द करतांना अडखळेल एवढा तो शब्दांपलिकडचा प्रवास अतुट आहे..
कविताताई आणि त्यांच्या बालिकांचं नातं म्हणजे...

पदर तुझा पदरातुन माये काय कसा उलगडला
वात्सल्याचा अनेक क्षणांनी तुझ्यामुळे बहरला...
जगण्या माझ्या अर्थ दिला, तु नावाला भावार्थ दिला तु
घडणाऱ्या अनाथ जीवाला मायेचा सार्थ दिला...
आयुष्याच्या या कवितेला तुच कवि अन् सुर दिला तु....

कविता वाघ ह्या हजारोंच्या मॉं साहेबांना शतश: नमन! महिला, मातृत्व आणि मातृत्वातून निर्माण केलेलं तुमचं मातृत्वाचं प्रांगण हे सदैव खुललेलं असावं .भगवान बाबा बालिकाश्रमातील प्रत्येक मुलीचा झोका उंचच उंच झुलावा अगदी तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या त्या कवितेतील आशेच्या किरणासारखाच‌...!

आई...!
आशेचा किरण तुझ्याही मनात असू देत| तु किती हिंमतवाण आहेस हे जगालाही कळू दे|अनेक रंगांनी तुझे जीवन रंगून जावू दे| आणि तु खुप मोठी होतांना मला पाहू दे|

कविताताई बालिकाश्रमातील लेकरांची प्राणप्रिय आई,  तुमच्या कार्याला सलाम. महिलादिनाच्या या आईला लाख लाख शुभेच्छा....!

                           🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...