शुक्रवार, ४ मार्च, २०२२

❤️अनाथांच्या आशेचा किरण; "कविताआई"❤️

                         💗"तिचं जग"💗


तिचं जग! या महिलादिन विशेष सदराच्या सुरुवातीला आपण मायेच्या वलयात भ्रमंती करुन आलो. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची व्याप्ती ही पुढील‌ हजारो वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात अजरामर असणार आहे. पण हा इतिहास वाचणं आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणणं हे कोणाच्या अंगवळणी पडत‌ नाही. मग काय, समाजहिताचे ते कार्य इतिसाच्या पानावरच निरंतर आपल्या वाचनातून जिवंत असते. माई निवर्तल्या पण त्यांच्या कार्याचं या वलयला अजूनही सिमा नसणार ये, हा प्रत्यय तुम्हाला आपल्या औरंगाबादमध्ये येईल जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या अतोनात मातृत्वाने भरलेल्या वात्सल्याच्या मुर्तीला भेट द्याल.

आई, हे साम्राज्य डोळ्यांच्या दृष्टीत सामावणारं नाही. ज्यांना ह्या साम्राज्याच्या सुरक्षित पटलाखाली जगण्याची संधी मिळते  त्यांना या अमृताची गोडी रोज त्यांच्या आईच्या, कुटूंबाच्या सहवासात प्राप्त होत असते. पण शेवटी जीवनचक्र आहे ते कोणासाठीच समान नसते. दु:ख, यातना,संघर्ष ,आनंद, जिव्हाळा हे प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जगण्या अविभाज्य भाग असला तरीही काहींच्या माञ जखमांवर फुंकर घालण्यापलीकडे त्यांचं आयुष्य खडतर असतं. त्यात अजूनही स्ञीजन्म आपल्या समाजात काही प्रमाणात कलंक मानला जातो हे कटु सत्य आहे. अशा निरपराध मुलींचा जन्म झाल्यापासून कचऱ्याच्या डब्यात तर कधी फुटपाथावरुन त्यांचा हा प्रवास सुरू होतो  आणि गोंधळलेल्या अवस्थेत तो निष्पाप जी माञ पोटापुरत्या अन्नासाठी भटकत असतो. आपण असं का भटकतोय? हे समजण्यापलीकडची त्यांची बिकट अवस्था असते. पण  आयुष्यात जसे दु:ख देणारे असतात तसेच त्याच दु:खावर सुखाचे पांघरुन घालणारे ही जन्माला येतच असतात. तर हेच वात्सल्याचे पांघरुन घालून या निराधार मुलींच्या आयुष्याला उबदार करण्याचे काम औरंगाबादमधील अनाथांची माय 'कविता वाघ' करता आहे. तर‌ जाणुन घेवुयात याच मायेचं तिचं जग!

कोणतेही कार्य हाती घेण्याआधी आपण त्या परिस्थितीतून प्रवास केलेला असतो. असाच अनुभव कविताईंना आपल्या बालपणात आला आणि त्यांच्या हातून निराधार बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कविताईंचे संपुर्ण बालपण हे कन्नड तालुक्यातील मेहगाव येथे ४३-४४ लोकांच्या कुटूंबात गेले. त्यांचे आजोबा हे गावचे पोलीस पाटील असल्याने गावात‌ त्यांचे संबंध सलोख्याचे होते. त्यांच्या आजोंबांकडे गावातील प्रत्येक समस्येचा न्यायनिवाडा होत असतांना कविताताईंवर त्या सगळ्या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम झाला. त्या अत्यंत बारकाईने आजोबा कशा पध्दतीने लोकांचे प्रश्न सोडवितात याकडे लक्ष‌ द्यायच्या. आपोआपच त्यांच्यात समाजाप्रतीची आत्मीयता निर्माण झाली व सामाजसेवेची मशाल नकळत त्यावेळेस त्यांनी आपल्या हाती घेतली. शिक्षणातून वाटचाल करत त्यांची जिद्दीने यश गाठले. अचानक विज पडावी तसा त्यांच्या आयुष्यात गडगडाट झाला जेव्हा‌ १९९६ साली त्यांचे वडील किसनराव घुगे यांचे अपघाती निधन झाले. काळा मोठा आला होता;कुटूंब पार‌ खचून गेले. कविताताईंना न पेलवणारं दु:ख झालं कारण बापाचं छञ हरपलं होत. क्षणार्धात ओळख पुसली गेली. ते तालुका प्रमुख असल्याकारणाने कुटूंबासह , गोरगरिबांचा आधारही संपला होता. कविताईंनी परिस्थितीचे गांभिर्य समजून घेतले आणि वडीलांच्या कार्यात झोकून देवून काम करण्याचा दृढ निश्चय केला.

कविताताईंनी सन १९९९ वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'जयकिशन शिक्षण संस्थेची' स्थापना केली. समाजात असलेली मुलींबद्दलची विषमता नेहमीच त्यांच्या मनाला खटकत होती. मुलगी ही समस्यांचे मुळ नसून समस्या सक्षमपणे हाताळणारा त्या समस्येचा पहिला आणि शेवटचा उपाय आहे असे त्यांचे ठाम मत आहे. आणि हेच मत प्रवाहात आणण्यासाठीचा त्यांचा पहिला प्रयत्न म्हणजे 'शांती कंप्युटरची' सिडको येथे स्थापना. यातून अनेक गरिब मुलींना या इंन्स्टिट्युट पर्यंत आणून कप्युटरचे शिक्षण देत स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. परिस्थितीला माञ हे मंजूर नव्हते. आर्थिक कारणांमुळे हे इंन्स्टिट्युट जरी बंद करावे लागले असले तरी हा छोटासा स्वल्पविराम होता. या आर्थिक परिस्थितीत त्यांचे पती त्यांच्या सोबत‌ खंबीरपणे उभे राहिले. समाजासाठी चांगले काम करतांना वाईट प्रवृत्तीचा सामना हा करावाच लागतो‌. पण त्यातून लढण्याची ताकद मिळते आणि याच ताकदीचा वापर करत कविताताईंनी औरंगाबादमधील सातारा परिसर‌ येथे 'भगवानबाबा प्राथमिक शाळेची' सुरुवात केली. परिस्थितीमुळे शिक्षणाची वाट अडलेले  विद्यार्थी, निराधार , अपंग विद्यार्थी यांच्यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. कोणत्याही समाजकार्यात फळाची अपेक्षा न करत झटत राहणाऱ्या कविताईंच्या कामाची‌ दखल त्यावेळच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली व तुम्ही वसतिगृह का सुरु करत नाही असा प्रस्ताव त्यांच्यासमोर‌ मांडत त्यांच्या कार्याची ही ज्योत ज्वलंत करण्याची संधी त्यांना उपलब्ध करुन दिली. यातूनच २००५ साली त्यांनी कन्नड तालुक्यातील १४ गावांमध्ये सुसज्ज वसतिगृह निर्मिती करत ७०० विद्यार्थ्यांना ममतेचा हात दिला. पण तरीही मुलींचा प्रश्न कायम होता. निराधार मुलींना आधार देणं ही आपली नैतिक जवाबदारी आहे‌ या विचाराने त्यांना कधीच स्वस्त बसू दिलं नाही. सरकार दफ्तरी येरझाऱ्या घालत त्यांनी अखेर २००६-२००७ साली महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार महिला व बालकल्याण अंतर्गत ५० मुलींसाठी 'भगवानबाबा बालिकाश्रमाची' स्थापना केली. आज त्या बालिकाश्रमाला वटवृक्षाचं स्वरुप आलय.तिथं गेलं की तो मुलींचा निरागस आवाज, लहान वयात आलेला समजुतदार पणा पाहून एक आनंद निर्माण होतो सोबतच समाजातील परिस्थिती बघून अश्रूही तरळतात. काही दोष नसतांना या मुलींना निराधार शिक्का लागतो, निसर्गतः मिळालेले अपंगत्व समाजाची बघण्याची दृष्टी बदलवते, अनाथ नसूनही अनाथपण नशिबी येते. पण त्या मुलींना याच वाईट समाजात अभिमानाने ‌जगण्यासाठी कविताताई तयार‌ करतात.

बाहेरच्या जगात त्यांच्या याच मुली आज कर्तृत्व गाजवता आहेत. या मुलींचं संगोपन करणं खरच त्याच्यासाठी अवघड होतं पण एका आईने सगळं निभावलं. सुरुवातीला बालिकाश्रमाला अनेक खडतर‌ प्रसंगांना तोंड द्यावं लागलं कारण ५० मुलींचीच परवानगी होती. पण त्या कायदेशीर बाबींची झळ कधी मुलींना कविताताईंनी लागू दिली नाही. २००८-०९ साली जेव्हा बालगृहाची जाहिरात त्यांनी वाचली तेव्हा आश्रमाची मान्यता मिळवत निराधार‌ मुलांनाही मायेची साद‌ त्यांनी घातली. त्यावेळी भगवानबाबा आश्रमाध्ये मुली, योगेश्वरी बालकाश्रमामध्ये मुले तर गोकूळ व भगवानबाबा  बालकाश्रमामध्ये‌ मुले असे एकूण ४०० मुलामुलींचे आश्रयस्थान कविताताई झाल्या. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं म्हणतात. याच म्हणीला खोडत कविताईंनी तिन्ही जगातील‌ मुलामुलींना एकसंध करत वात्सल्याच्या कवेत त्यांना घेतलं. कविता ताईंच्या मुलींचा दिवस हा उठल्यापासून आव्हानं घेवून येतो.अगदी‌ सकाळी ब्रश करण्यापासून ते स्वत:ची तयारी करुन शाळेत जावून येई पर्यंत त्यांची परिक्षा असते. एखादं मुल जेव्हा बालिकाश्रमात‌ आणलं जातं तेव्हा त्याची मनोवस्था खचून‌ गेलेली असते. नेमकं आपल्यासोबत‌ घडतय तरी काय? हे आकलन करण्याइतपतही समज त्या लेकरांना नसते. तेव्हा फक्त गरज असते ती मातृत्वाची. त्या मुलावर झालेल्या मानसिक आघातातून त्याला बाहेर काढत‌ आश्रमात एकरुप होण्यात मदत करणं खरच सोप्प नसतं. पण माया लावली की वासरुही एक दिवस हंबरडा फोडत अश्रुंतून दु:खाला वाट मोकळी करुन देतेच.

या आश्रमाचा कविताताईंच्या अथक परिश्रमातून खुप विस्तार झाला आहे. त्यांच्या कार्याला सामाजिक संस्था,अनेक कुटूंब , महाराष्ट्र ‌शासन सदैव हातभार लावत असतात. कोरोना काळातील परिस्थितीतही कविताईंच्या या संस्थेला अनेक समाथिक संस्थांनी मदतीचा हात दिला. कविताताईंचा काळजी होती माञ मनात ठाम विश्वास होता की या संकटाला फाटकाच्या आत प्रवेश करू द्यायचा नाही आणि तसैच झाले. सर्वतोपरी काळजी घेत त्यांनी आपल्या लेकरांच रक्षण केलं. कविताताई आपल्या मुलींना उत्तमोत्तम शिक्षण मिळावं यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांना यश म्हणून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच पडत असते. आज या आश्रमातील कविताताईंच्या लेकी स्वबळावर इंजिनिअर, डॉक्टर, फार्माशिस्ट अशा अनेक क्षेञात बालिकाश्रमाचं नाव मोठं‌ करता आहेत. मुलांमधील‌ गुण ओळखून त्याच्या छंदाचं रुपातंर हे उपजीविकेत कसं करता येईल‌ याचं योग्य मार्गदर्शन हे‌ कविताताई आपल्या लेकरांना करत असतात. याच मुलींसाठी योग्य जोडीदार बघून त्या त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळवून देतात. यापेक्षा मोठं काय असू शकतं या मुलींसाठी. कविताताईंचा समाजकार्याचा हा आलेख खरच आकलनापलीकडच्या पातळीवर आहे. त्यांनी त्यांच्या मुलींना सर्व परिस्थितीशी तोंड देण्यासाठी सक्षम केलेले आहे. पण तरीही का बरं समाजात मुलगी जन्माला अजून विरोध आहे? का आपल्या आईवडीलांना मुलं वृध्दश्रमात पाठवतात? एवढी लोकसंख्या असतांना ही निष्पाप लेकरं निराधार का? तर‌ या परिस्थितीवर भाष्य करतांना कविताताई सत्यपरिस्थितीची जाणीव करुन देतात. मुलगी जन्माला येणं म्हटलं की आईवडीलांच्या जीवाला अगदी घोर‌ लागतो तिची सुरक्षा, तिच्या लग्नाचा खर्च, गरिब परिस्थिती असून तिच्या कल्याणासाठी अव्वाच्या सव्वा हुंडा या विचारानेच‌ ते खचून जातात. ग्रामीण भागात तर सध्या वातावरण एवढं खराब आहे‌ की आईवडील शेतात जातात पण मन‌ माञ मुलीमध्ये अडकलेलं असतं की ती एकटी घरी सुखरूप असेल ना? मग यावर उपाय काय तर मुलगीच नको; यामुळे समाजात विषमता पसरते. जर हुंडाबळीसारखी गुन्हा असूनही ही प्रथा अजून चालू असेल‌ तर कोणत्या बापाला आपल्या मुलीची काळजी वाटणार‌ नाही. जर या जगात तिला मुक्त फिरता येत नसेल तर कोणता बाप बेचैन होणार नाही. हुंडा देणं‌ आणि घेणं या गुन्ह्याला जेव्हा सरकार दरबारी कडक शिक्षेतून आळा बसेल तेव्हा माञ कोणत्याच बापाला आपली लेक ही भार‌‌ वाटणार‌ नाही. उलट एक मुलगी ही एका मुलांपेक्षा आईवडीलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. ज्या मुलीला नाकारलं जातं तिच बापाच्या काळजाचा तुकडा असते. पण या समाजातील हुडाबळीसारख्या कुप्रथांमुळे बापलेकीचं नात्यात दुरावा ही गोष्ट आली.

आपण ज्या घरात वाढतो त्या घरात होणाऱ्या संस्कारातून आपण घडत असतो. आपण कधी विचारच केला नाही की , एखादा मुलगा आपल्या पालकांना वृध्दाश्रमात  नेवून सोडत असेल‌ तर आपण त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की, काय हा मुलगा आईवडील सांभाळत‌ नाही. पण तो असंं का वागत असावा ही मनस्थिती आपण समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला का?त्याच्यावरती आधी तसे संस्कार रुजवले गेलेले नक्कीच असू शकतात.पण त्याच्यावर संस्कार होतांना कुटूंबातलं वातावरण जर त्याला तसं मिळालं असतं तर कदाचित त्याने ते पाऊल उचललं नसतं. यासाठी भांडवल, पैसा लागत नाही तर आपण करणाऱ्या कामातून मिळणारं समाधान महत्वाचं असतं. मनाची श्रीमंती‌ आणि आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी समाजाला देणं यापेक्षा दुसरं सुख नाही. मी, माझं यापलिकडे जावून विचार करण्याची शक्ती जर मुलांमध्ये निर्माण केली तसेच आपण समाजाचं देणं लागतो हे संस्कार जर आपल्या मुलांवर केले तर नक्कीच कोणत्याच आईवडीलांना वृध्दाश्रमाची पायरी चढावी नाही लागणार. कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. समाजातील परिस्थितीत खोलवर शिरून या गोष्टी का घडत असाव्यात हे शोधून काढले तर‌ नक्कीच समाजात परिवर्तन घडवून आणायला वेळ नाही लागणार. कविताताईंची समाजाप्रती असणारी ही जाण खरच विचार करायला भाग पाडणारी आहे. महिला व मुलींनी आपल्यात अंतर्भुत असणारी शक्ती  ओळखली पाहिजे. तिच्यातील उर्जेचा योग्य प्रकारे वापर करुन ती नक्कीच स्वतः च्या पायावर भक्कम पणे उभी रहात आपल्या कुटूंबालाही साथ देवू शकतेच आणि हे फक्त स्ञीच करु शकते. तर उठा, दुसऱ्यांसाठी जगता जगता एकदिवस आतमधल्या स्वत:च्या प्रतिमेला भेटा तुम्हाला नक्कीच तुमचं जग सापडेल. कविताताईंचा हा संदेश अगदी मोलाचा आहे. कविताताईंनी काम करतांना कधी स्वत:चा विचार केला नाही. सतत त्यांच्या मुलींसाठी त्या झटत असतात. एवढेच नाही तर २०१२ पासून त्या सातारा येथील पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा समितीत कार्यरत आहेत. यातून त्या समाजातील महिलांच्या प्रश्नाची सोडवणूक करत त्यांचे समुपदेशन करतात. त्यांचे आयुष्य सत्कारणी लावण्यात त्यांना मदत करतात.  त्यांचे कार्य हे कोणत्याच चौकटीत बसणारं नाही एवढं ते विलोभनीय आहे. कविताताईंच्या नावातील कविता ही त्यांचा प्रवास शब्दबध्द करतांना अडखळेल एवढा तो शब्दांपलिकडचा प्रवास अतुट आहे..
कविताताई आणि त्यांच्या बालिकांचं नातं म्हणजे...

पदर तुझा पदरातुन माये काय कसा उलगडला
वात्सल्याचा अनेक क्षणांनी तुझ्यामुळे बहरला...
जगण्या माझ्या अर्थ दिला, तु नावाला भावार्थ दिला तु
घडणाऱ्या अनाथ जीवाला मायेचा सार्थ दिला...
आयुष्याच्या या कवितेला तुच कवि अन् सुर दिला तु....

कविता वाघ ह्या हजारोंच्या मॉं साहेबांना शतश: नमन! महिला, मातृत्व आणि मातृत्वातून निर्माण केलेलं तुमचं मातृत्वाचं प्रांगण हे सदैव खुललेलं असावं .भगवान बाबा बालिकाश्रमातील प्रत्येक मुलीचा झोका उंचच उंच झुलावा अगदी तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या त्या कवितेतील आशेच्या किरणासारखाच‌...!

आई...!
आशेचा किरण तुझ्याही मनात असू देत| तु किती हिंमतवाण आहेस हे जगालाही कळू दे|अनेक रंगांनी तुझे जीवन रंगून जावू दे| आणि तु खुप मोठी होतांना मला पाहू दे|

कविताताई बालिकाश्रमातील लेकरांची प्राणप्रिय आई,  तुमच्या कार्याला सलाम. महिलादिनाच्या या आईला लाख लाख शुभेच्छा....!

                           🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


७ टिप्पण्या:

  1. कविताताईंचं कार्य खरचं खुप महान आहे, त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा आणि सलाम, या लेखाच्या माध्यमातून खुप प्रेरणादायी माहिती मिळाली, खुप छान लिहिलंस प्राची.....

    उत्तर द्याहटवा
  2. 👌👍छान अजय नाईक उंण्डणगावकर.

    उत्तर द्याहटवा

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...