शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

राजं🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

राजं
                       🚩🚩राजं🚩🚩

बलदंड असा हा शिव‌ पहा..... !
सशस्त्र असा हा शिव‌ पहा....!
 राजं तुम्ही आलात.... !
असंख्य जनसमुदायाचा निश्चयाचा महामेरू, अखेर त्या ११ च्या ठोक्याला अश्वारूढ होऊन साक्षात अवतरला....
राजं तुम्ही आलात....!तुमच्या संभाजीच्या नगरात दिमाखात आलात....राजं तुम्ही आलात... !
अंधारातून जसा तळपता सुर्य क्षणात उगवावा आणि साऱ्या विश्वास अंधकार बाजूला सारून‌ प्रकाशाचा उदय व्हावा तसे तुम्ही आलात....
राजं तुम्ही आलात...!
तुमच्यानंतर स्वातंञ्याच्या नावाखाली असंख्य बेड्यामध्ये अडकलेल्या तुमच्या प्रजेला मुक्त करण्यासाठी आलात....
राजं तुम्ही आलात......!
राजं तुम्ही आलात....!
अगदी असाच साक्षात्कार काल‌राञीच्या त्या अदभुत, अनाकलनीय सोहळ्यात झाला.कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तो डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा काल १८ फेब्रुवारी राञी ११ वाजता पार पडला.लाखोंच्या नजरा आतुरतेने एकच दृश्य पाहण्यास अत्यंत आतूर झाले होते
संपुर्ण शहर जणु त्या भगव्या रंगाच्या छटेत तल्लीन होऊन अर्ध्या रात्री ढोल ताश्यांच्या तालावर ठेका धरत होते...
कित्येक पिढ्या क्रांती चौकाच्या परिसरात ओलांडल्या या एका पिढीचा इतिहास जपण्याच्या नादात , या अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळ्यात सामील मानव रूपी गर्दी केवळ त्या एका नावासाठी आली होती.. त्या जाणत्या राजासाठी ओथंबली होती ...जागा मिळेल तिथून आपल्या राजाचं अश्वारूढ स्वरुप डोळ्यात साठवून घेत होती. "न भूतो न भविष्यती"! असा हा डोळ्याचे पारणं फेडणारा अनावरण सोहळा खरच संभाजी नगरच्या इतिहासाचं वैभव असणार ये. तो अनुभव तेजोमय दिव्यत्वाची प्रचिती देणारा ठरला.साक्षात छत्रपती अश्वारूढ होऊन आले.एवढ्या अलोट जनसागरातही उभ्या जागेवरुन महाराज‌ सगळ्यांना भेटले.नजरेनी ते दिव्यत्व क्षणार्धात टिपले अन् खरच तिथे महाराजांचा भास झाला.देशातील सर्वात उंच मुर्ती आपल्या सर्वश्रेष्ठ राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची, ती ही ऐतिहासिक शहरात !खरच.... अभिमानाने ऊर भरून यावा असा हा सोनेरी क्षण....!
कर्तृत्वाने जग जिंकलं जातं याचं सर्व श्रेष्ठ उदाहरण म्हणजेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज...! आपल्या संभाजीनगरच्या क्रांती चौकात आता शिवतीर्थ अवतरले...
हिम्मत ना कोण्या शञुची ना देशद्रोह्याची 
कारण आगमनानेच किर्ती झाली झाली ,
अश्वारूढ ढाण्या वाघाची...
छञपती शिवरायांचा ध्यास हाच प्रजेचा अखंड श्वास हे महाराजांच्या पुतळ्याकडे बघता क्षणीच जाणवते. किर्तीवंत राजाची मुर्तीवंत रुपातील मुर्ती जगभर किर्तीचा विषय ठरतेय. या पुतळ्याची उंची २१ फुट,चौथऱ्याची ३१ फुट तर या पुतळ्याचे वजन हे सुमारे ७ मेट्रिक टन असुन पुतळ्यावर २४ कमानीत महाराजांचे २४ मावळे त्यांना पहारा देत शानेने उभे आहेत.गेल्या चार‌ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या या पुतळ्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
अन्
  संपुर्ण वातावरण शिवमय समुद्रात अथांग खोलवर गेले. ढोलपथकांचा दांडगा उत्साह, 
आसमंतातील शिवघोष , भगव्या झेंड्याचा मंडप आणि 

अमाप शिवप्रेमी जनसागर...काय तो नजारा काय तो डोलारा, शिवदंग शिवगुंग ,शिवरंग झाला खुला नभी आसमंत सारा

शिवनेरीवर राजा जन्मला,किल्यावर आनंद पसरला
शिवबा तो जन्माला आला,स्वराज्य रक्षक पुढे बहरला

निधड्या छातीने वार झेलणारा ,दिनदुबळ्याचा सळसळणारा वारा, शिवराय म्हणजे मराठी मनामनांचा एक लखलखणारा तेजस्वी ध्रुव तारा..

शिवरायांची तलवार , तळपणाऱ्या आगीतून चढलीय तिला चांगलीच धार...
अश्वारूढ होऊनी निघतो तो ,रयतेच्या कल्याणासाठी
रक्तांच्या थारोळ्यातही लढतो ,फक्त आणि फक्त देशप्रेमापोटी....


हा सोहळा बघून रयत धन्य झाली. पण महाराजांची किर्ती अशी एका दिवसाने नाही न साधता येणार. शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयांचे आदर्श आहेत.त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकत‌ आपण मोठे झालो. इयत्ता चौथीचं फक्त एक पुस्तक महाराजांच्या आयुष्याची संपूर्ण ओळख करुन देते. पण शिवाजी महाराज‌ हे वलय आपल्यात आहे का? हे आपल्या अंतर्मनात आपण कधी डोकावून पाहिलंय?

 निश्चयाचा महामेरू ,बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी...!
हे आपलं राजं.....!
प्रत्येकाला शिवाजी महाराजांचा आदर्श वाटतो, जिजाऊच्या संस्काराची किमया वाटते.आपण सहज महाराजांचं उदाहरण देतो, एवढा त्यांचा इतिहास आपल्या मनावर‌ बिंबवला गेला आहे.‌ माञ, आजच्या युगात प्रत्येक आईला वाटतं शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्याच घरात. जिजाऊंच्या हातुन शिवबा सारखा पुञ घडावा तो‌ दुसऱ्यांच्याच घरात.अन्यायाने पाखडली जाणारी जनता दिसतेय, सिमेवर शहीद होणारे जवान दिसताय माञ, शिवाजी दुसऱ्यांच्याच घरात‌ जन्माला यावा. स्वतंञ राष्ट्रात अंतर्गत हितशञुच देश पोखरताय, आयाबहिणींच्या इज्जतीचे भर रस्त्यात वाभाडे निघता आहेत. माञ, शिवाजी दुसऱ्यांच्याच घरात जन्माला यावा. भ्रष्टाचार, बेरोजगारी, लाचारी,बेकारी याने देश देशोधडीला लागावा माञ शिवाजी दुसऱ्याच्याच घरात जन्माला यावा. कित्येकांना टोचेल ,कित्येकांना पटेल माञ, ही भुमी तेव्हाच पावन होईल जेव्हा प्रत्येक आई म्हणेल माझा मुलगा शिवरायांसारखा शञुला मगरमिठी मारुन लढेल. नुसतं शिवाजी नाव धारण करून होत नाही तर त्यांच्या अंगातील प्रत्येक रक्तपेशीतील रक्तात  देशप्रेम, रयत प्रेमाचं वास्तव्य असावं जे छञपती शिवाजी महाराजांच्या रोमारोमात होतं. 

शिवाजी महाराजांनी देश घडवला, त्यांच्या छञछायेखाली संपुर्ण रयतेला सुरक्षिततेचा पहारा दिला. समान न्याय, एक धर्म, एक राष्ट्र या एकत्वाची भक्ती , जगदंबेच्या आशिर्वादाने रयतेच्या मनमनात रुजवली तेव्हा तो राजा श्रेष्ठ ठरला. पण आपण माञ‌ देशसेवेत सैनिक म्हणून रुजू व्हायला घाबरतो, सैन्यात भरती होणाऱ्याची वाट रोखतो. तिथे मग देशप्रेमाच्याही वर पुञप्रेम, नाते वरचढ ठरते. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणाऱ्या तरुण पिढीलाही मागे खेचण्यात आपणच अग्रेसर‌ असतो. आपल्याला देशातील सुव्यवस्थेपेक्षा, जागोजागी होणाऱ्या भ्रष्टाचारापेक्षा आपला जीव आणि पैसा महत्वाचा वाटतो. असे आम्ही शिवाजीचे मावळे.जगणं असह्य व्हावं असा क्षण आला तरी आपल्यातील शिवमावळा लपून बसेल असे आपण शिवप्रेमी. नुसते जयघोषातून शिवप्रेम दाखवणारे. आपल्या देशात कित्येक गैरव्यवहार होत असतात, सुडाचे‌ राजकारण गल्लोगल्ली चालू असते. कित्येक गुन्हे डोळ्यासमोर‌ घडतात, पण तेव्हा माञ आपल्यातला शिवाजीचा मावळा सगळ्या गोष्टी नजरेआड टाकत नुसता अन्यायाच्या छञाखाली जगत राहतो. 

आज आपण रयतेच्या राजाची श्रीमंत योगी छञपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती साजरी करतो आहोत. ३९० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी केलेल्या अफाट कार्याचा वेध आपण आजही घेत असलो तरी, आपण त्यांच्या कार्याला जागत आहोत का? त्यांनी दिलेले सुसज्ज, सुव्यवस्थित, शांतताप्रिय साम्राज्याचे धडे आपण गिरवत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला एकदा तरी विचारून बघावा. आपण चुकतोय, आपण भरकटलोय म्हणून आज साक्षात महाराजांना अश्वारूढ होऊन यावं लागलं. हे त्या बोलक्या मुर्तीकडे एकटक बघितल्यावर जाणवतं. हात आपोआपच जोडले जातात, पण राजं, तुमच्या नजरेत बघायला लाज वाटते कारण, तुम्ही आलात माञ तुम्ही निर्माण केलेली गुंतवणूकदार प्रजा, शांतताप्रिय प्रजा, आज्ञाधारक प्रजा माञ राहिली नाही हो. अखंड तुमच्या नावाचा जयघोष दुमदुमतो आहे. रोमारोमातून शिवप्रेम ओसंडून वाहत आहे माञ जगण्यात, आचरणात जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा तुमची खरी शिवजयंती असेल. जेव्हा सगळा ताण विसरुन शिवाजीचा मावळा हर हर महादेव !च्या गजरात तुम्हाला आत्मसात करेल, तेव्हा देशातील अनैतिक गोष्टींना कायमचा आळा बसेल आणि प्रत्येकाच्या मनमनात खरी शिवजयंती साजरी होईल. "छञपती शिवाजी महाराज" होणं हे अत्यंत जोखमीचं कारण, शिवाजी महाराज घडवायचे असतील तर जिजाऊंसारख्या महान आईसाहेबांना जन्म घ्यावा लागेल. परंतु आपण शिवराय नाही तर‌ शिवरायांचे मावळे बनून ह्या देशात चालणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा अंत नक्कीच करु शकतो.

आपल्या शिवरायांसारखी तलवारीने रक्तरंजित होळी खेळायची नाही तर लोकशाही अस्ञ वापरुन शञुंचा नायनाट करायचा आहे. महाराजांची कृपा म्हणून आपण हुकमशाहीच्या दोऱ्यांतून सुटलो, पण लोकशाहीच्या स्वतंञ दोरीचा हुकूमशाहीत दोरखंड व्हायला वेळ नाही लागणार, जर आत्ताच आपण सावरलो नाही तर‌ ......! महाराजांना शञूची चाहूल लागत होती. त्यांना शञुला निरखुन बघताच शञुंची चाल कळत असे. माञ, आपल्या देशात एवढे हितशञू आहेत की ते बाजूला असूनही वार केल्याशिवाय समजत नाही. केव्हा आपण जागे होणार? 'जय भवानी, जय शिवाजी' गर्जनेतून मिळणारी ऊर्जा सामाजिक कार्यात खर्ची घालायला हवी. नुसत्या रॅल्या काढुन एक दिवस गाडीवर फिरल्याने समाजात बदल घडणार नाही. त्यासाठी शिवाजी महाराजांचे मावळे बनावेच लागेल. एकदा स्वत: ला शिवभक्त म्हणवून घेतांना माझ्यात शिवाजी महारांनी शिकवलेले गुण आहेत का?....शिवाजी महाराजांनी आखुण दिलेल्या रस्त़्यावर चालत आलो आहे का? हे विचारा...जर उत्तर हो असेल तर मग मनाच्या आणि पोटाच्या आतड्यांपासून ओरडून, जिवाच्या आकांताने,  निधड्या छातीने शिवरायांचा जयघोष करा.....

'जय भवानी जय शिवाजी'..... 

आणि तोच खरा मावळा असेल....;इतिहासाच्या पानावर‌ असणारा राजा मनात मुखोद्गत करत, घ्या ढाल‌ हातात आपल्या देशातील समस्यांना संपवण्यासाठी...! महाराज आहेतच पाठीशी....जेव्हा गरज पडेल तेव्हा महाराज‌ स्वत: तलवार घेवून आपल्याला संकटातून बाहेर काढतील. पण आता लढायची गरज आहे. महाराजांच्या युक्त्या, महाराजांचा इतिहास जल्लोषापुरता उघडण्याची वेळ आता निघून गेलीय. आता तो इतिहास वर्तमानात बदलून महाराजांना शरण जात त्यांच्याकडून बदलाची तलवार घेवुन लागा कामाला....संकट तडीपार होईल, तेव्हाच छञपतींची खरी शिवजयंती होईल.....!

संभाजीगरच्या इतिहासतलं हे लखलखतं सोनेरी पान अश्वारूढ महाराजांनी घेरलं. धन्य झाली ही नगरी जिच्यावर शिरस्ता असणार‌ आहे, साक्षात रयतेच्या राजाचा...
नमन त्या किर्तीवंत शिवरायाला, शतश: नमन.....

राजं मुजरा....🙏🙏🙏


   ‌                राजं......
                🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️ 




१६ टिप्पण्या:

  1. लेख खूप आवडला�� छान आशयाने/उद्देशाने लिहिला आहे असं नक्कीच जाणवतय.. विचार करायला लावणारा आणि स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा देखील वाटला.����
    �� छोटीशी गोष्ट पण महत्त्वपूर्ण वाटते म्हणून सुचवू इच्छितो की, आपल्यादरे "व्याकरण दृष्ट्या वाक्यांची रचना आणि विरामचिन्हांचा वापर" याकडे लक्ष असावे. जेणेकरून वाचकाच्या मनात एखाद्या वाक्याला वाचताना प्रतीत होणाऱ्या अर्थाबद्दल संभ्रम निर्माण होऊन,अर्थाचा अनर्थ होऊ नये...आपला मूळ मतितार्थ मनापर्यंत पोहचला जावा.. हिच सदिच्छा..!!
    ��All the best ��

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नक्कीच मी याकडे लक्ष देईल...तुमचा अभिप्राय खरच मनाला भावला.... धन्यवाद

      हटवा
  2. खुप छान लिहिलं आहे. जय जिजाऊ जय शिवराय.🙏🏻🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  3. 👌👌खूप खूप छान लिहिले आहे. अजय नाईक

    उत्तर द्याहटवा

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...