शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

औरंगाबादचा सोनेरी नजराणा.....

औरंगाबादचा सोनेरी नजराणा......

औरंगाबाद म्हणजे 52 दरवाज्यांचे शहर, औरंगाबाद म्हणजे हिमरू शालीची बाजारपेठ, औरंगाबाद म्हणजे इतिहासातील महत्त्वपुर्ण घडामोडींची साक्ष देणारे शहर.औरंगाबाद म्हणजे अजिंठा एलोरा पर्यटन केंद्राचा केंद्रबिंदू . महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणजे औरंगाबाद.आणि संभाजी नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच औरंगाबादची विशेष ओळख म्हणजे ऐतिहासिक शहर.पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर इतिहासाच्या भक्कम पाऊलखुणा घेऊन ताठ मानेनं उभं आहे.आणि नुसतं उभंच नाही तर त्याने तो वारसा अगदी सराईतपणे जपुन ठेवलाय.याच वारस्याचा अभ्यास आतापर्यंतच्या सगळ्याच पिढ्या करत आहेत त्या ऐतिहासिक ठेव्याला जिंवत ठेवत आहेत.

त्याच पिढीतली मी एक.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे उगवत्या पञकारितेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून अभ्यासावर आधारित सहल आयोजित करण्यात आली होती.त्याच संदर्भातील माझा अनुभव.औरंगाबादचे विविध पैलू उलगडतांना आपल्याला एक महत्वाचा असा पैलू सापडतो .तो म्हणजेच सोनेरी महल. "The golden Place". ही ऐतिहासिक वस्तु औरंगाबाद शहरातील सातमाळा या नयनरम्य पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात स्थित आहे.वास्तुसमोर उभं राहताच एखाद्या चिञकारानं रेखाटावं असं विहंगम दृश्य आपले पाय जागेवरच थबकवून ठेवते. मागच्या बाजूला झाडे-वेली पाना फुलांनी सजलेले डोंगर आणि पायथ्याशी हा महल.एक वेगळीच प्रसन्नता वाटते.अभ्यासाच्या दृष्टीकोनातून आम्ही सगळे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरती बारीक नजर ठेवून होतो.इथे आल्यावर पहिला प्रश्न याला सोनेरी महलच का म्हणतात ?असा पडणे अगदी सहाजिकच आहे. तर सोनेरी महालाच्या तळमजल्यावर दरबार महालातील चिञे ही खऱ्या अर्थाने सोन्याचा मुलामा देवून रंगवलेली आहे.म्हणूनच या आयताकृती वास्तूला सोनेरी महल असे नाव पडले. ही वास्तू दुमजली असून उंच चौथऱ्यावर अगदी शोभून दिसते.आपण जेव्हा सोनेरी महालाच्या भव्य प्रवेशद्वारातून आणि पुर्वीच्या नावाप्रमाने हाथीखाण्यातून प्रवेश करतो तेव्हा या वास्तूची मजबूत अशी तटबंदी बघायला मिळते. या वास्तुला चारही बाजूंनी सुरक्षा भिंत आहे. या हाथीखाण्याचे भव्य बांधकाम,निमुळत्या कमानी आणि कोरीव.नक्षीकाम खरच वास्तुच्या सौंदर्यात भर घालते. याच हाथीखान्यातून प्रवेश केल्यावर एक मार्ग हा महालाकडे जातांना दिसतो. आणि याच रस्त्याच्या मधोमध एक लंबाकार जलाशय आपल्या नजरेस पडतो.मिळालेल्या माहितीनुसार मुघल‌ स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणजे हा जलाशय.यात असंख्य मासे आहेत जे अजून त्या जलाशयाच्या सौंदर्यात भर घालतात.पुढे वरती चोथरा चढल्यावरती आपल्याला जलाशयाची एक वेगळीच बाजू कळते. ती म्हणजे याचे बांधकाम हे पाटाच.या पध्दतीने केले आहे.म्हणजे पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वरच्या पसरट भागातून ते पाणी लंबगोलाकार जलाशयात साठवले जाते .आणि हेच पाणी दोन्ही बाजूंनी असलेल्या बांगांना पुरवले जाते.पावसाळ्यात छोट्या धबधब्या परी वाहणारं हे पाटाचं पाणीबघण्याची मज्जा येथे काही औरच असते.त्या काळातही शाश्वतता किती छान पध्दतीने जोपासली हे आपल्याला जाणवते.

सोनेरी महालाच्या दर्शनीय भागात 'लाला हरदौल' यांची समाधी सुमारे५० मीटर अंतरावर आहे.हे बुंदेलखंड ओरशा नरेश वीरसिंहदेव यांचे पुञ व पहाडसिंगराजा यांचे भाऊ होते.लाला हरदौल हे बुंदेलखंडातील महान स्वतंत्र सेनानी व कुशल योध्दा होते.त्यांची समाधी ही चौरस आकाराची असुन समाधी परिसरात दगडी पायऱ्यांची विहीर आहे. संपुर्ण वास्तुचे बांधकाम हे दगड,लाखोरी विटा आणि ,चुन्याचे आहे.खालच्या मजल्यावर एक स्तंभबध्द दालन व चार अन्य खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर मध्यभागी एक दालन असून चार कोपऱ्यात चार खोल्या आहेत. वास्तुच्या पहिल्या दालनात १८व्या शतकातील चिञकलेचा ठेवा बघायला मिळतो. हे चिञ लाकडावर कोरले गेलेले असून यात मुख्य म्हणजे फुलापानांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगछटांचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो.रामायणातील दृश्य,वराह अवतार,कृष्णाची रासक्रिडी असे अनेक प्रसंग त्या चिञांतून जिवंत करण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.त्यापुढील दालनात लाकडांवर कोरलेली चिञ आपल्या डोळ्यात जणु तेज आणतात.गजलक्ष्मी असो वा विष्णुच्या युगातील प्रसंग.ती पेंटीग आपल्याशी हितगुजच करते. त्याच्याच बाजूला काचपेंटींग आहेत.ज्या ८० च्या दशकांपासून सोनेरी महलाचे सौंदर्य वाढवत आहेत. याच वास्तुच्या पहिल्या मजल्यावरील पुढच्या दालनात १९७९ साली प्रादेशिक वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आले. ज्यात पुरातन कलावस्तूंचा सग्रह करण्यात आला आहे.यात उत्खननात सापडलेल्या प्राचीन मुर्ती,चिञे,भांडी, दागिने,शिल्प,,शस्ञे असे विविध प्रकार संग्रहित आहे. तेर , उस्मानाबाद येथील उत्खननातून सापडलेली भाजलेल्या मातीची भांडी, कलावस्तू,लाकडी फळीवर व काचेवर रेखाटलेली चित्रे, मराठवाड्याच्या विविध भागांतून प्राप्त दगडी शिल्पे याचा अनमोल ठेवा आपल्याला बघायला मिळतो.तसेच जुन्याकाळातील मुदपाकखान्यातील भांड्यांचे केलेले जतन आपल्याला त्या काळात घेवून जातात.याच संग्रहात एक तिजोरी आपल्या दृष्टीस पडते.ती१८७०मध्ये वैजापुर मध्ये सापडली.तसेच येथे कागदी लगद्यापासून बनवलेल्या वस्तुंचाही संग्रह आहे..त्या काळात संदेश पोहोचवण्यासाठी . वापर‌ केला जात असे.म्हणजे यावर संदेश लिहून तो राजापर्यत पोहोचवला जात होता.यावर देवनागिरी आणि मोडी लिपीचा वापर केलेला असल्यामुळे आपल्याला ती लिपी समजत नाही. त्या काळातील दिव्यांचा अलौकिक संग्रही या दालनात आपले लक्ष‌ वेधतो.त्यावरील नक्षीकाम हे आजघडीला ही जमणं खरच शक्य नाही .

सोनेरी महालातील एक सगळ्यात लक्षवेधी दरबार दालन हे भिंतीवरील‌ चिञांचे आहे . या चिंञांमध्ये निसर्गाचे प्रतिबिंब आपल्याला आढळतेे. या चिंञांमध्ये मुघल चिञशैलीचे दर्शन घडते.वनस्पती वास्तुशास्ञाशी संलग्न असलेल्या कलेत झाडे,पाने,फुले,फुलदाण्या यांनी सुशोभित केलेल्या भिंती खरच भारी वाटतात.बारीक निरीक्षण केल्यास गुलाब आणि लिली या फुलांची चिञे त्या भिंतीवर रेखाटलेली दिसतात.तसेच याच भिंतींना सोन्याच्या पाण्यानी मुलामा दिलेला आहे.पण असं म्हणतात की त्या काळात हे सोने चोरुन नेले असल्याने तिथे आता खुप कमी प्रमाणात सोने जाणवते. याच दालनात दिव्यांची प्रकाशव्यवस्था अशा पध्दतीने केली की तो प्रकाश पडताच ती सोन्याची दालने सुवर्ण प्रकाशात उजळुन निघतात.या सोन्याच्या महालामध्ये पारसिंग राजा,पद्मसिंग राजा,जयसिंग राजा,भावसिंग राजा यांचे दरबार भरत असे.हा महल‌ जवळपास ३००ते ३५० वर्षापुर्वीचा आहे.हा सोनेरी महल हा औरंगजेबासोबत दख्खनमध्ये आलेल्या बुंदेलखंडाच्या सरदाराने बांधला आहे.याच दरबारा बालााजीची तांब्याचीसुंदर मुर्ती आहे जी १९व्या शतकात औरंगाबादच्या उत्खननातून सापडली.

यानंतर दगडी शिल्प दालनात आम्ही प्रवेश केला.या दालनात एकूण तेहतीस मुर्ती आहेत.त्यात काही अरेबिय, उर्दू ,पार्शियन अशा विविध भाषेतील शिलालेख आहेत.याच दालनात अखंड लाकडापासून तयार करण्यात आलेला सुंदर असा अष्टभुजा गणपती आहे. वेरुळ मधील दवणे यांच्या सागवान वाड्याचे अवशेष येथे आणुन त्याचे रुपातंर नक्षीदार मंदिरात केलेले आढळते.आणि याच गणेशाच्या बाजूला राधाकृष्णाची मार्बलची रेखीव मुर्ती आहे.या लाकडी ठेव्याला किड वगैरे लागु नये म्हणून वेळोवेळी विशिष्ट केमिकलचा वापर करुन त्याची देखरेख केली जाते.यानंतर विरूद्ध बाजूला असणाऱ्या सोनेरी महलच्या शस्ञास्ञ दालनाात प्रवेश करताच आपल्याला तोफा बघायला मिळतात.यातील काही तोफा या औरंगजेबाच्या काळातील आहेत तर काहींचे अवशेष हे उत्खननातून सापडलेले आहे.इथे आपल्याला विविध प्रकारचे तोफगोळे ,शस्ञांस्ञांचा संग्रह बघायला मिळतो.याच दालनातील पुढील बाजुस वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प आहेत.त्याचबरोबर त्याकाळातील शोभेच्या वस्तुंचा खजिनाही इथे दिसतो.याच दालनातून वरच्या मजल्यावर सोनेरीमहल देखरेख कार्यालयात आहे.आपल्याकडे जर ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असेल तर संपर्क साधून आपणही एक पाऊल ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने टाकू शकतो.

खरच सोनेरी महल‌ म्हणजे औरंगाबादचा अभिमान वाढवणारा अमुल्य खजिना आहे.येथे मिळालेली माहिती आमच्यसाठी जणु दैवी  देणगी आहे.अशा वास्तुंचं जतन आपल्या पुढच्या हजारो पिढ्यांना सदन बनवू शकते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.तिथे गेल्यावर एक गोष्ट माञ पोटतीलकेने जाणवते.अजूनही गरज आहे ह्या वास्तुचे संवर्धन करण्याची. वास्तूकडे येणारा रस्ता हा अजून व्यवस्थित हवा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या वास्तुचा इतिहास पोहोचायला हवा.या वास्तुकलेने आजपर्यंत खुप संघर्ष बघितले,मोठमोठे उत्सव साजरे केले . ऊन, वारा, पाऊस झेलले तरी ती तटस्थ उभी आहे.आपला इतिहास जागता ठेवत! सगळ्यांना हीच विनंती नक्की सोनेरी महलला भेट द्या आणि ह्या दिव्य वास्तुचा अभ्यासात्मक आणि संशोधनात्मक दृष्टीकोनातून सखोल अभ्यास करा .काही तरी दिव्य हाती लागल्या शिवाय राहणार नाही!

                              🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


२ टिप्पण्या:

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...