मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

स्वातंञ्याची पंचाहत्तरी

स्वातंञ्याची पंचाहत्तरी
                      स्वातंञ्याची पंचाहत्तरी
पुर्वसंध्या स्वातंञ्यदिनाची, नांदी असावी ही एका नव्या कोरोनोत्तर पर्वाची 

भारतमाते जननी आमुची,तुच रक्षिणी या धरतीची
मोड मान या कोरोनाची नव्याने रच कहानी या पावन भारतभुमीची

वंदुनी तुजला साक्ष देते वचनाची 
जपेल तुला चाहुल लागताच संकटाची 

काळजी घेईल ग तुझ्या नैसर्गिक संपत्तीची 
हे माते गिळंकृत कर मती कोरोनाची.....

 नमस्कार मंडळी...अहो आपला भारतदेश म्हणजेच हिंदुस्तान म्हणजेच इंडिया आणि म्हणजेच भारताच्या आधीचेही आर्यवर्त;आज आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय.अत्यंत बिकट परिस्थितीतुन हाडाची काडी करत तर कधी मोठी खिंड लढवत छत्रपती शिवाजी महाराजांपासुन ते पेशवे त्यानंतर आपल्या मातृभक्तांनी, स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावुन प्रसंगी बुध्दीचातुर्यातुन ब्रिटिश सरकारला सळो की पळो करु सोडले व आपल्या अतिप्रिय अशा मातृभुमीला पारतंत्र्याच्या बेड्यांतून मुक्त कले....तो दिवस म्हणजे १५ आगस्ट १९४७...हाच तो दिवस ज्या दिवसाच्या पहिल्या ठोक्याला म्हणजेच रात्री 12 वाजता...स्वतंत्र भारताचे बिंग फुटले..आणि पाऊलवाट सुरु झाली ती विकसनशील भारताकडे.आणि आज 75 वर्षे पूर्ण होऊनही ती चालूच आहे.आपला भारत देश म्हंटला की डोळ्यांसमोर दृश्य उभे रहते ते दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या,हिरवागार समृद्ध असा निसर्ग, ऐतिहासिक वारसा लाभलेले मोठमोठे गडकिल्ले,मंदिरे,लेण्या,त्याचबरोबर विविध भाषा,संस्कृती ,धर्म,संतांची शिकवण यांचा एकत्रित संगम म्हणजेच. आपला भारत देश. 
 काय वर्णावे तुझे रूप
अमाप अखंडित भारता तुझे स्वरूप....!
आपल्या भारताने न मोजता येतील एवढे संकटे झेलली ,पण संकटावर मात करत जो मोठ्या शानेने तिरंगा फडकवतो ,त्याचेच नाव म्हणजे भारत!
भारताला पूर्वापार मिळालेले गतवैभव हे भारताचे खरे अस्त्र आणि खरी संपत्ती आहे.75 वर्षात भारत देश हा अफाट आणि अमाप बदललाय'अगदी सगळ्याच पैलुतून विचार केला तर कमी असे इथे काहीच नाही.एवढी आपली भारतभूमी सुसज्ज आहे.अगदी सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् या गाण्यात रवींद्रनाथ टागोरांनी केलेल्या शब्दारचनेसारखी.आपली भूमी ब्रिटिश तावडीतून सोडणुकीसाठी जितके प्रयत्न झाले त्यानंतर तितकेच ती भूमी एक राष्ट्र म्हणून उभे करण्यात घेतले गेले.एकापेक्षा एक कार्य हाती घेण्यात आले. यातली सर्वात मोठी देणगी म्हणजे संविधानरुपी मिळालेले सामान्य जनतेला अधिकार आणि त्यातून पुढे झालेली उन्नती. लोकशाहीचा अधिकार व त्यातून देशोन्नती साठी निर्माण झालेले सुपुत्र ज्यांनी आपल्या देशाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज आपल्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे स्मरण करणे अगत्य आहे.
आज मागे वळून बघताना,मनात प्रश्न पडत आहेत आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे उलटली तरी आपला देश जगात कुठे आहे?भारत सगळ्याच गोष्टीत आघाडीवर आहे तरी माझा भारत देश मागे का रहतो? तर तो मागे राहत नाही तर त्याला मागे ओढले जाते असे मला वाटते.देश हा समुदायाने बनतो आणि त्यातूनच पुढे जातो आणि आपल्या देशाचा प्रचंड जनसमुदाय हा जसा आपला देशाच्या प्रगतीचे कारण आहे तसाच तो आपल्या देशाला अधोगतीकडे नेण्यासाठी जवाबदार आहे.ही अत्यंत टोकाची भूमिका वाटेल पण बघा.आपला भारत म्हणजे जात,धर्म,लिंग या समीकरणाच्या पलीकडे जाऊन एक्याभावना जपणारा देश! इथे जात म्हणजे एकच ती म्हणजे माणुसकी! पण काळाच्या चक्रात आणि सत्ताकारण ,श्रीमंतीच्या लालसे पोटी कुठे नेऊन ठेवलाय आपला भारत देश ?असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आता तर सर्व जातीवर येऊन थांबलं आहे.जातीयवादावरुन दंगली होतांना दिसतात.आणि हीच जात शिक्षण,राजकारण इथपर्यंत पोहचत अख्खं वाटोळं झालेलं बघायला मिळतय.शिक्षणात आर्थिक मदत आणि भरती ही विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांकनावरून नाही तर जातीवरून मिळते.राजकारणात मत हे जातीवरून मिळते ना की व्यक्तीच्या नेतृत्वगुण आणि हुशारीवरून.असे चित्र मागच्या 15 _२० वर्षापासून दिसायला लागले.आधीही लोक होते ज्यांच्याकडे सत्ता होती आणि श्रीमंतीही होती पण त्यांनी कधीच ती स्वतःवर हावी होऊ दिली नाही.देश हा सर्वोच्च स्थानावर ठेवला.राजकारणही समाजासाठी केलं आणि विरोधही केला तरी मर्यादा ओलांडली नाही. पण आता सर्व या उलट. आपला देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला याचं कारण मुळात देशाचा योग्य दिशेने न होणारा विकास,लोकसंख्या अश्या विविध गोष्टी असल्या तर योग्य ती दिशा न मिळाल्याने देश मागे राहतोय.एका विशिष्ट वर्गालाच सर्व सुविधा प्राप्त होतात आणि ग्रामीण भाग,अती ग्रामीण भाग मात्र अजुनही देश स्वतंत्र झाला तिथेच आहे .हुशारी,बुद्धिमत्ता तिथेही आहे पण त्यांना त्या सुविधा असून त्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाही.आपल्या देशातील नागरिकांची सर्वात कमजोर नस म्हणजे पैसा.पैशावर देश विकायला निघालेल्यांची संख्या काही कमी नाही.लोकशाही ने सर्वात मोठा दिलेला अधिकार म्हणजे मतदान, अपल्या देशासाठी योग्य तो निर्णय घेतील असे उमेदवार निवडून देणे.पण या सर्वात मोठ्या अधिकारामुळे लोकशाही म्हणजे पैसा कमविण्यासाठी चे साधन.500 रुपयांसाठी पाच वर्षे गुलामगिरी स्वीकारून राजकारण्यांची चाकरी करणारे आपल्या देशाचे सुजाण नागरिक.परत विकास झाला नाही की बोंबलत आणि त्याच 5०० रुपयांची आठवण काढून मूग गिळून गप्प राहतात. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण,खुर्ची कारण मीच कसा मोठा हे दाखवण्याचे बनलेले ठिकाण.75 वर्षात जे करू शकले नाही ते जर इमानदारीने देशभक्ती मनात ठेऊन जर देशाच्या नेतृत्वाने केले तर नक्की देश या सर्व गोष्टींपलीकडे जाईल. कोरोना विषाणूने अचानक येऊन घाला घातला,देश ताळेबंद झाला आणि देशाची आरोग्य यंत्रणा जागी झाली. आपला देश परत एकदा विळख्यात सापडला.अजुनही सत्र चालूच आहे.देशातील आरोग्य विभागाने आर्मी सारखे अहोरात्र काम करत देशसेवेचे एक वेगळे उदाहरण स्थापित केले.कित्येक कोरोना योद्धे जन्माला आले.तर काहींनी यातही चुकीचे कामे करत आरोग्य यंत्रणेला काळीमा फासली.एखादी महामारी येते तेव्हा देशात आरोग्यात्मक विकास कसा आहे हे खऱ्या अर्थाने जनतेसमोर येते. ऑक्सिजनची कमतरता, कित्येक दिवसांपासून धूळखात पडलेली वेगवेगळी मशिन्स,त्यात झालेली बिघाड,काही काही आरोग्य केंद्रांना यंत्रसामग्री नसल्याकारणाने गेलेले जीव हे सर्व एकूणच विदारक आहे.अजुनही आपल्या देशाची आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे. ऑलम्पिकमध्ये आपल्या देशाच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली.त्यांच्या जिद्दीला, खेळा ला सलाम. ऑलिम्पिकच्या गुणतालिकेत भारत 41
व्या क्रमांकावर आला.काही पदके थोडक्यात निसटली.बाकीच्या देशांच्या तुलनेत का बरं आपला देश एवढे उत्कृष्ट खेळाडू असताना मागे राहतोय? तर ते मागे राहता आहेत फक्त त्यांच्या मानसिकतेमुळे.त्यांना जो विश्वास हवा असतो तो कदाचित आपल्याकडुन‌ त्या खेळाडुंना मिळत नसावा. आपल्या देशातील युवापिढीतप भयानक ताकद आणि जिद्द आहे. जर त्यांना योग्य मार्गदर्शनातून मार्ग दाखविला तर विकसनशील देशातून विकास झालेल्या देशांच्या यादीत आपला देश लवकरच पाऊल टाकेल. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती.पण परत एकदा ती सावरते आहे.भारतात आर्थिक गरिबी असण्याचे कारण म्हणजे पैशाचा चुकीच्या पद्धतीने वारेमाप वापर.पण नक्कीच या कोरोनाकाळात सगळ्यांनाच घरी बसल्यावर त्याचे महत्त्व कळालेच असणार यात तसूभरही शंंका नाही.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.भारतात जवळ जवळ 80%लोक हे शेतकरी आहे.परंतु आताच्या काळात निसर्गाची अवकृपा म्हणावी का? मानवनिर्मित संकट...शेतकरी राजा ,देशाचा पोशिंदा मात्र चांगलाच संकटात सापडला आहे. दुसरा काही जोडधंदा नाही म्हणून या वाईट परिस्थितीतून ते मात्र आत्महत्येचा सहारा घेत स्वतःला संपवत आहे.शेती हा आपला कणखर पैलू आहे.शेती आहे तर भारत देश आहे!पण आपल्याच हव्यासापोटी, सोयीसुविधांसाठी आपण त्या निसर्गावरच घाला घालत आहोत.जिथून ही सुंदर सृष्टी निर्माण झाली.ज्या डोंगर दऱ्या आपलं पालन पोषण करताय त्यांच्यावरच आपण कुऱ्हाड चालवतोय.नद्यांना तर नाल्याचं स्वरूप देवुन त्यांचे अस्तित्वच त्यांच्याकडुन हिरावुन घेतोय.
अजुनही निसर्ग आपल्याला खुणावतोय वेळ गेलेली नाही; देश तिथेच आहे आपणही तिथेच आहोत.परत एकदा चक्रव्यूहाच्या विळख्यात सापडलेल्या आपल्या मातृभुमीला सोडवण्यासाठी हातभार लावा.आपला भारत म्हणजेच विविधतेत एकता.लोकशाहीत जनताच राजा असते.आपल्याच हातात आहे आपला देश विकासाच्या दिशेने नेण्याची.जे लोक आपल्या देशाला भ्रष्टाचार,जातीय वाद, गुन्हेगारी,लाच,महामारी या सगळ्यात ढकलण्याचा प्रयत्न करताय त्यांना फरपटून आपल्या मार्गातून बाहेर काढा.आणि आपल्या मायभूमी ,जन्मभुमीसाठी सैन्यदलातील सैन्यासारखे खिंड लढवा.आज या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतातील सर्व बाजूंच्या सीमारेषेवर अखंडित पहारा देणाऱ्या त्या वीर जवानांना यातून सलाम केला नाही तर या लेखाला रूपच येणार नाही. मानयलाच पाहिजे आपल्या देशातील सैन्यदलाला!आजच्या घडीला भारतासारखी आर्मी कुठेही नाहीत.भुदल, नौदल,वायुदल आणि आधुनिक अस्ञशस्ञांनी आपला भारत देश सुसज्ज आहे याचा मला अभिमान वाटतो. इथे आपल्या देशाची खरी ताकद कळते.
आजच्या या पंच्याहत्तरीतील भारत देशाला संबोधुन माझ्या प्रिय देशवासीयांना एवढेच सांगावेसे वाटतेय...आपला देश म्हणजे....
एक राष्ट्र
एक स्वप्न
एक संकल्पना
एक जात
एक भावना
आणि......
एक धर्म, राष्ट्र धर्म...
 या काहीच शब्दात मला काय बोलायचं आहे तुम्हाला नक्कीच उमगलं असेल....
 पंच्चाहत्तरीतला माझा भारत चिरायू होवो...एक नवे लक्ष गाठो, विकासाच्या मोतींनी सदैव धनसंपदा साठो...
 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्षाच्या  शुभेच्छा...!

                             🖋️प्राची नाईक उंडणगावकर🖋️



४ टिप्पण्या:

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...