मंगळवार, १ मार्च, २०२२

"शिक्षणातून माणुसकी घडवणाऱ्याआदर्श शिक्षिका; सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी"

                        💗"तिचं जग"💗
शिक्षण म्हणजे समाजातील विषमतेला तडीस नेण्याचे सामर्थ्य, शिक्षण म्हणजे बुध्दीला विचाराची जोड आणि माणसाला साक्षरता प्राप्त करून जीवनाची दिशा दाखवण्यासाठीचा एक सुलभ मार्ग.शिक्षणातून माणूस घडतो, माणसातुन देश घडतो आणि त्याच देशाचे परिपुर्ण असे विश्व होते.याच शिक्षणप्राप्तीसाठी मनुष्य प्राण्याला गरज असते ती एका गुरुची, जो त्याला योग्य मार्गदर्शन करेल.आई- वडील‌ हे पहिले गुरु असूनही बौध्दिक, मानसिक ज्ञानप्राप्तीसाठी पुर्वापार चालत आलेली अध्ययन प्रणाली म्हणजे शाळा, महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे. तिथेच आपल्याला आपल्या खऱ्या जगाची ओळख होत असते आणि ही ओळख करून देण्याचे काम करतात आपले शिक्षक. आज अशाच एका निवृत्त आदर्श शिक्षिकेविषयी आपण जाणून घेणार आहोत. शिक्षणाला सामाजिक कार्य समजुन खडतर परिस्थितीतही विद्यार्थी घडवण्याचा वसा घेतलेल्या उंडणगावच्या निवृत्त आदर्श शिक्षिका सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी!
 
 सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव या छोट्याशा खेड्या गावात नाईक कुटूंबात त्यांचा जन्म झाला. गाव तसं खेडं पण चांगलं मोठं. याच मोठ्या गावात त्यांचं भलमोठं कुटूंब. आईवडीलांना ५ मुली आणि काकांचे २मुलं आणि ३ मुली असं १४ जणांचं एकञ कुटूंब. परिस्थिती अगदी हलाखीची. पण मंगलाबाई म्हणजेच आताच्या कुलकर्णी मॅडमला अभ्यासाची फार‌ गोडी. लहान वयात शिस्तीने अभ्यास करणाऱ्या मंगलबाईंनी एक स्वप्न बघितलं शिक्षिका होण्याचं. त्याच ध्येयपुर्तीसाठी त्यांनी काहीही करुन शिकायचे हा ध्यास ‌मनाशी बाळगला. १० पर्यंतचं शिक्षण त्यांनी उंडणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केले. योगायोगाने आपले शिक्षक असणारेच काका वसंतराव नाईक यांच्या सहाय्याने त्यांचा नंबर औरंगाबादला शासकीय डि.एड अध्यापक महाविद्यालयात लागला. परिस्थिती वाईट असल्यामुळे वडिलांना त्यांना बाहेर पाठवणं अवघड होतं पण त्यांनी हिम्मत बांधली आणि मंगलाबाईंना पाठवलं. २वर्षाच्या अथक मेहनतीनंतर शेवटी ऐन केन प्रकारे१९७२ साली त्यांचे डि.एड पुर्ण झाले. १९७२ तो‌ दुष्काळाचा काळ. मराठवाडा प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसत असताना मॅडमलाही ती झळ लागली. पण त्याच दुष्काळात त्यांच्या घरातील दुष्काळ संपवण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला. १९७२ सालीच जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत त्या आपल्याच जन्मभुमीत म्हणजे उंडणगावला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. घरातील पहिली मुलगी ही स्वबळावर तेही अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षिका झाली याचा आईवडीलांना खुप आनंद झाला.
 
 त्यांच्या यशाचं संपूर्ण श्रेय हे त्यांना मार्ग दाखवणाऱ्या वसंतराव नाईकांना जातं हे त्या आवर्जून सांगतात. कुलकर्णी मॅडमनी त्यांचं शिक्षिका होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं होतं. लहानपणापासून आपल्या भावंडांची सवय असल्याने शाळेत त्या लहान मुलांमध्ये रममाण होऊन जायच्या. पण तितक्याच त्या शिस्तबध्द . स्वत: शिस्तीचे पालन करत त्यांनी मुलांना शिस्तीचे धडे देत हसत‌खेळत आनंदाने ज्ञानार्जन केले. याच शैक्षणिक प्रवासात त्यांना मोलाची साथ‌ लाभली ती त्यांचे श्रीमान‌ प्रकाश लक्ष्मणराव कुलकर्णी. तेही पेशाने शिक्षक. अत्यंत बुद्धिमान आणि शिक्षणक्षेञात अमुल्य असे योगदान देणारे कुलकर्णी सर यांच्या कौतुकाला सिमा नाही. सुरुवातीला उंडणगाव आणि नंतर‌ खंडाळासारख्या छोट्याशा गावात‌ जिथे शिक्षणाचे बीजच नाही अशा गावात त्यांनी जिल्हा परिषद शाळा आपल्या कौशल्यातुन खुलवली आणि आदर्श शिक्षक पुरस्कारासह शिक्षण क्षेत्रातील अनेक पुरस्कारांना गवसणी घातली. कुलकर्णी मॅडम या विशेष शिक्षिका असण्याचे कारण म्हणजे त्यांनी कधीच त्या पेशाकडे नोकरी म्हणून बघितले नाही तर 'आपण ज्या समाजात‌ राहतो‌ त्याचे‌ देणं लागतो.विद्यार्थी घडवणं‌ म्हणजे देश घडवणं हा त्यांचा यामगचा स्पष्ट दृष्टीकोन होता.' त्यामुळे त्यांनी १० ते ४ शाळा शिकवण्यापलीकडे ती घडवली. 
 
वेगवेगळ्या उपक्रमातून खेड्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावत त्यांच्यातील गुणांची जाणीव करुन दिली. प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिकरित्या त्या काळात त्यांनी लक्ष दिले. पालकांशी संवाद साधत शिक्षणाची जनजागृती त्यांनी केली. गरीब परिस्थितीतही शिकण्याची जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना तर‌ त्यांनी सर्वतोपरी मदत केली. मैदानी खेळ, भाषण स्पर्धा, शैक्षणिक सहल असे उपक्रम त्यांनी लहान मुलांसाठी राबवले व सगळ्यांच्या लाडक्या शिक्षिका होण्याचा मान पटकावला. हे सगळं करत असतांना त्या फार‌ ओढाताण होत‌ असे कारण वडीलांच्या जाण्यानंतर आई अंथरुणावर आणि तीन मुलं. त्यांचं करुन शाळेत ड्युटी बजावणं खरच सोप्पं नव्हतं पण कडक शिस्तीच्या कुलकर्णी मॅडम नी तेही दिव्य यशस्वीरित्या पार‌ पाडत शाळेचा कारभार‌ सांभाळला. 

आज मागे वळून बघतांना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तयार‌ झालेले अनेक विद्यार्थी विविध क्षेञात आपला झेंडा यशस्वीपणे फडकवत आहेत. त्यात प्रसिद्ध आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक, अँडव्होकेट मिलिंद महाजन, डॉ.राजेंद्र धनवई, शिक्षक दगडू लांडगे असे असंख्य गुणवंत आहेत‌ ज्यांना मॅडमच्या शिक्षणछायेत आपला शिक्षणविकास साधता आला. शिक्षण काळात अनेक कटूगोड प्रसंगांना त्यांना सामोरे जावच लागले. अर्धी सेवा उंडणगावच्या शाळेसाठी खर्ची घातल्यावर अचानक त्यांच्या बदलीचे सरकारी दफ्तरातून फरमान निघाले. गोड आठवणी कटूप्रसंगामध्ये बदलायला वेळ लागला नाही. कारण ज्या विद्यामंदिराचा कुंटूंबाप्रमाणे सांभाळ केला ते सोडणं खरच अवघड होतं. कर्तव्याचा एवढा काळ एकाच‌ शाळेत राहून‌ विकास साधनं खरतर‌ ही अवघड गोष्ट असते. तसेच घरची जवाबदारी सांभाळून दुसऱ्या गावात शिकवायला जाणे खरच त्यावेळी तारेवरची कसरत होती. ही बातमी जेव्हा शाळेत आणि गावात पसरली तेव्हा सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. पण सरकारी आदेशापुढे नमतं घेणं भाग होतं आणि मॅडम त्या बदलीच्या गावाला रुजू झाल्या‌. विद्यार्थी माञ हिरमुसले; संपुर्ण शाळेचं प्रांगण जणु स्तब्ध झालं होतं. पण विद्यार्थ्यांनी मॅडम परत या ची दिलेली हाक खरच देवाने मंजूर करावी अशी झाली आणि पुढच्या दोनच दिवसात मॅडम पुन्हा आपल्या केंद्रीय प्रशालेला उंडणगाव मध्ये रुजू झाल्या. कटु आठवण गोड आठवणीत चुटकीसरशी बदलली. कारण गाव, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागणीतून परत मॅडम आपल्या मुळ ठिकाणी परत आल्या होत्या. हा अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी कौतुकाची थाप होती हे सांगतांना त्यांच्या अनेक शालेय आठवणींना उजाळा मिळाला. 

शिक्षण क्षेञात वरिष्ठांकडून मिळणारी कौतुकाची थाप आपल्याला ज्ञानदान करण्यास प्रोत्साहन देते. आपण अथक परिश्रम घेत‌ शिक्षणाचे समाजकार्य करत असतो आणि एक दिवस आपल्या कार्याला परिपुर्णता प्राप्त होते. लहानपणी बघितलेले स्वप्न सत्यात उतरुन ते निवृत्तीच्या दिशेने कधी सरसावले याची काडीमाञ जाणीव मॅडमला आपलं कार्य करतांना झाली‌ नाही. अखेर २८ फेब्रुवारी २०१० ला आदर्श शिक्षिका प्रतिभा प्रकाश कुलकर्णी यांच्या नावापुढे निवृत्त हे नाव‌ लागले आणि शिक्षणाचे बाळकडू त्यांनी आपल्या पुढच्या पिढीकडे देत खडू खाली ठेवला. त्यांचे दोंन्ही मुलं आणि एक मुलगी आज उच्चशिक्षित होवून आपापल्या क्षेञात‌ कार्यरत आहेत तर मोठा मुलगा हा प्राध्यापक आहे. निवृत्त १२ वर्षे होवून देखील‌ विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची धडपड त्यांची आजही चालू असते. त्यांच्या आई-वडीलांच्या नावाने त्या दरवर्षी गुणवंत शालेय‌ विद्यार्थ्यांना पारितोषिक पर रक्कम देतात; जेणेकरून तेवढीच त्यांना शिक्षणाला उभारी मिळेल.अनेक शालेय कार्यक्रमात ‌त्या आवर्जून सहभागी होत‌ विद्यार्थ्यांचे आजही मनोबल‌ वाढवतात. 

सौ.प्रतिभा कुलकर्णी मॅडम आजच्या काळातील ‌विद्यार्थी पालकांचा खाजगी शालेय संस्थांकडे वाढणारा कल बघतांना म्हणतात की‌, जिल्हा परिषद शाळा या खऱ्या‌ अर्थाने‌ शिक्षणासाठी परिपुर्ण असतांना त्यांची सद्यस्थितीला असणारी दयनीय अवस्था न बघवणारी आहे. जर‌ जिल्हा परिषद शिक्षकांनी झोकुन देवून काम करत परत एकदा उत्तम दर्जाचे ‌शिक्षण देत विश्वास संपादन केला तर नक्कीच विद्यार्थी परत एकदा सरकारी शाळेकडे वळतील. खंत वाटते की आज जिल्हा परिषद‌ शाळेला विद्यार्थी नाहीत; ओस पडलेल्या शाळेत बसायला व्यवस्थित वर्ग नाही. मी निर्माण केलेली शाळा आता मला कुठेच दिसत नाही हे विचार‌ मांडतांना त्या माञ भावूक झाल्या. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झाले आणि‌ विद्यार्थ्यांची शाळेची नाळ तुटली. 

'विद्येचे मंदिर ते विद्येचेच असते'.

घरी बसून कितीही विद्या ग्रहण केली तरी शाळेची मज्जा काही औरच असते. यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेचे धडे मिळणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर‌ विद्यार्थ्यांमधील एकलकोंडेपणा वाढेल असेही त्या म्हणाल्या. आजही त्या शिक्षण क्षेञाच्या बाबतीत मिळेल त्यावेळेला काम करत असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. आजही कुलकर्णी मॅडम या सगळ्यांच्या तितक्याच‌ लाडक्या अध्यापिका आहेत. त्यांचा गोड मार‌ खावून आज मोठ्या पदापर्यंत मजल मारणारे विद्यार्थी ही अनेक आहेत. तो मार खरच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

अशा या उंडणगावच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ निवृत्त आदर्श शिक्षिका 'सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी मॅडम' यांना महिला दिनाचा सलाम! तुमच्यासारख्या प्रामाणिक शिक्षिका घडल्या तर‌ देशाचे भविष्य सुरक्षित हातात असेल ही अगदी काळया दगडावरची पांढरी रेघ आहे!तुम्हाला उंदड आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
        ‌‌
                               🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

१७ टिप्पण्या:

  1. छान प्राची तुझ्या लेखणीतून उत्तमोत्तम लिखाण येत राहो हीच शुभेच्छा..

    उत्तर द्याहटवा
  2. वाह खूप छान लिहिलंय प्राची.... कुळकर्णी मॅडम ह्यांची अजुन एक खासियत म्हणजे त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पण तितक्याच ताकतीने सांभाळल्या. माझ्या त्या मोठ्या काकू आहेत तर आम्ही खूपदा पाहिलंय शाळा करुन सर्व नातलागांकडे आवर्जून जाणाऱ्या... सगळी कामं करणाऱ्या... आज हा लेख वाचून त्यांना माझा नमस्कार...

    उत्तर द्याहटवा

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...